
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , आमदार राजेंद्र पाटील येद्रावकार, आमदार सत्यजीत देशमुख, प्रमुख MACCI चे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगावे, आणि MACCIA’ चे संपूर्ण कार्यकारिणी मंडळ उपस्थित होते.
अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडवणे हा असून, ग्रामीण भागाचे रूपांतर व्यवसाय आणि प्रगतीच्या प्रमुख केंद्रांमध्ये करणे हे आहे. ‘MACCIA’ने ‘गाव तिथे उद्योजक इनक्युबेशन काउन्सिल’ च्या माध्यमातून २०२६ ते २०३१ या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६,००० ग्रामीण सूक्ष्म उद्योजक (RMEs) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ऐतिहासिक योजनेमुळे ग्रामीण भागात सुमारे १,४४,००० हून अधिक शाश्वत स्थानिक रोजगारांची निर्मिती होणार असून, अभियानाच्या तिसऱ्या वर्षापासून वार्षिक ३,६०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. यासोबतच ग्रामीण उद्योजकतेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी ३०० सामाजिक उद्योजकांनाही प्रशिक्षित व स्थापित केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये ग्रामीण भागाचे मोठे योगदान असले तरी अद्याप अनेक ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध नाहीत. गावातील तरुण, महिला, शेतकरी आणि बचत गटांच्या सदस्यांमध्ये अफाट क्षमता असूनही त्यांना भांडवल, बाजारपेठ, योग्य मार्गदर्शन आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, ‘MACCIA’ने या अभियानाची संकल्पना देशातील हरितक्रांती आणि धवलक्रांतीच्या धर्तीवर एक नवी ‘ग्राम उद्योग क्रांती’ घडवण्यासाठी तयार केली आहे. हे अभियान राबवण्यासाठी एका प्रगत हब-अँड-स्पोक मॉडेलचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष समुदाय प्रवेश केंद्रे सुरू केली जातील. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ५ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान सुरू केले जाईल, ज्यामध्ये ५,००० ग्रामीण सूक्ष्म उद्योजकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘MACCIA’चे नवनियुक्त अध्यक्ष श्री.रवींद्र माणगावे यांनी या मोहिमेचे महत्त्व आणि दूरदृष्टी विशद करताना सांगितले की, “आमचे व्हिजन महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा आर्थिक कायापालट करणे हे आहे. ‘गाव तिथे उद्योजक’ हे केवळ एक अभियान नसून ग्रामीण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणारी एक मोठी चळवळ आहे. पहिल्या पिढीतील ग्रामीण तरुण आणि महिलांना केवळ नोकरी शोधणारे न ठेवता त्यांना नोकरी देणारे बनवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. या माध्यमातून आम्ही सरकार, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला एकाच मंचावर आणून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उद्योग आणि रोजगाराची गंगा पोहोचवणार आहोत, ज्यामुळे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होईल.”
या अभियानांतर्गत शेती आणि पूरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग, हस्तकला, लघु उद्योग आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल. ग्रामीण सूक्ष्म उद्योजकांना व्यवसाय नियोजन, कर्ज पुरवठा, बाजारपेठेशी जोडणी, ब्रँडिंग, परवाने आणि तंत्रज्ञान दत्तक घेण्यासाठी ‘सिंगल-विंडो’ प्रणालीद्वारे सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. ‘उद्योग विचार मंच’ च्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती आणि क्षमता बांधणीचे कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामुळे तळागाळातील नवउद्योजकांना शोधणे सोपे होईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ‘MACCIA’ने विविध कॉर्पोरेट्स, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञान भागीदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या सर्वंकष प्रयत्नांमुळे आगामी काळात ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल, असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.