
Manoj Jarange Patil, Maratha Reservation, Maharashtra Bandh
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) जालना, बीड, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांत कडकडीत बंदचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, तोडगा न निघाल्यास धाराशिव जिल्हाही बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आज मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध भागांत आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड आणि लातूरसह अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको केला. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती पाहता सरकारने आजच तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. पण सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र आणि आक्रमक करण्याचा इशाराही मराठा समाजाने दिला आहे. त्यामुळे यापुढची आंदोलनाची रणनीती काय असणार आणि सरकार चर्चेतून कोणता तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
दरम्यान, कालच्या हिंसक आंदोलनानंतर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पण यासोबतच मराठा कार्यकर्त्यांकडून प्रमुख महामार्ग आणि शहरांमधील वाहतूक रोखली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
बंदच्या काळात बाजारपेठा बंद असल्या तरी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने नियमित सुरू राहतील. यासोबतच शाळा महाविद्यालये, शैक्षणित संस्था देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध पुरवठा, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवाही सुरू राहणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात अनेक ठिकाणी भागांत मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको, ठिय्या आणि उपोषण आंदोलन करण्यात आले. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर मराठा बांधवांनी आक्रमक रस्ता रोको केला. पुलावर ठिय्या मांडत आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. यावेळी गाडी सोडण्याच्या कारणावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
लातूर शहर आणि जिल्ह्यातही मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. तसेच गुरुवारी पुकारण्यात आलेला लातूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसील कार्यालयासमोरही जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बालाजी पाटील कदम बटाळकर या मराठा तरुणाने मागील चार दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.