
‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, असा दावा भास्कर जाधव यांनी केला. सरकारकडून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना किंवा मंत्र्यांना पुढे करून आश्वासने दिली जातात. मात्र, त्यानंतर दिलेला शब्द पूर्ण केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. महायुती सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, हीच वस्तुस्थिती असल्याचे जाधव म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. सरकारमधील कोणत्याही नेत्यावर आता जरांगे पाटील यांचा विश्वास राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी आपण जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांच्यावर मराठाद्वेषाचा आरोप केला. प्रत्येकवेळी नवा शासन निर्णय काढून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर विश्वासघात होतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे जरांगे पाटील उद्विग्न झाल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्याची प्रतीक्षा कायम आहे. अद्याप ठोस चर्चा न झाल्याने जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत मुंबईत पोहोचावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जाण्याऐवजी स्वतंत्रपणे मुंबईकडे रवाना व्हावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली