
Sharad Pawar, Jayant Patil, NCP SP, BJP, NDA Alliance, Maharashtra Politics
एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान, शरद पवार यांनी विधान भवनात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला त्यांच्या गटाचे १० पैकी ९ आमदार उपस्थित होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा करून एनडीए सोबत जायचे की नाही, याबाबक त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे सांगितले जाते.
अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसध्ये जाण्यापेक्षा थेट भाजपमध्ये सामील होणे अधिक योग्य आहे, असा पर्याय सुचवला आहे. मतदार संघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणे आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय ताकद वाढवण्यासाठी एनडीएसोबत जाणे अधिक योग्य असल्याचे काही आमदारांनी म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत विविध राजकीय पर्यायांवर चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या तीन आमदारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चर्चेची माहिती दिल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मात्र, या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या सर्व घडामोडींनंतर, “आता अंतिम निर्णय शरद पवार घेतील आणि तो लवकरच कळवण्यात येईल,” असे जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे एनडीएसोबत जाण्याबाबत शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लक्षणीय बाब म्हणजे नऊ आमदारांच्या बैठकीला आमदार रोहित पवार मात्र उपस्थित नव्हते. भाजपसोबत जाण्याच्या पर्यायाला त्यांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले जाते. बैठकीनंतर रोहित पवार यांनीही आमदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या भूमिका जाणून घेतल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आता शरद पवार स्वतः पक्षाच्या आमदार आणि खासदारांची स्वतंत्र बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.