(Photo - Social Media)
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अंतरवाली सराटीतून निघताना जरांगे पाटील चांगलेच भावूक झाले. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. “समाजाच्या लेकरांपेक्षा मला मोठे काय आहे. माझ्या समाजाचे लेकरं संकटात आहेत त्यांच्या कल्याणासाठी मी जातोय,” असं म्हणत त्यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.
“सरकारला वाटतंय मी त्यांना शरण यावे; पण समाजाच्या लेकराला अर्धवट सोडून मी समाजाला धोका देऊ शकत नाही. मला ते मारून टाकणार आहेत म्हणून मी आझाद मैदानावर जात आहे. मी माझ्या समाजाला त्रास होऊ देणार नाही. मी लढून मरेल,” अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.
Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!
मुंबईकडे रवाना होताना त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. “न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची,” असं सांगत त्यांनी समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं. पक्षापेक्षा समाजाला महत्त्व द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
“मी आझाद मैदानावर बसणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही,” असा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे अंतरवाली सराटीतून त्यांचा निघतानाचा क्षण भावनिक ठरला.
मुंबईतील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात ५० जणांना आंदोलनाची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनासाठी पोलिसांकडून घालण्यात येणाऱ्या नियम आणि अटींचं पालन केलं जाईल, असंही अर्जात नमूद करण्यात आलं आहे. १८ सप्टेंबर रोजी ठरवून दिलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
मात्र, सध्या गणेशोत्सवाचा काळ असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता परवानगी मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






