maratha leader manoj jarange patil reaction on Dhananjay Munde resignation
जालना : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केल्यानंतर मुंडेंनी अखेर राजीनामा दिला आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. संपूर्ण राज्यभरामध्ये आक्रोश मोर्चा काढून जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांसाठी आवाज उठवला होता. आता अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून “जे झालं चांगलं झालं. अजित पवार आणि फडणवीस यांची नियत महत्त्वाची आहे. एवढी मोठी घटना होऊन मग्रुरी जशीच्या तशी आहे असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
माध्यमांशी संवाद साधताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढी मोठी घटना होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मग्रुरी जशीच्या तशी आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर त्यांना पश्चात्ताप होणार नाही. असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहे. एक दिवस यांची लंका डुबणार. यांची मग्रुरी आणि मस्तीखोरामुळे यांची लंका पाण्यात डुबणार. हे लयाला जाणार आणि पाताळात जाणार आहे” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आता सरकारवरील नामुष्की ओढवली, मी या स्वरूपाचा असा राजीनामा देतो. तसं बोलत नाही तो. आताही तीच मग्रुरीची भाषा आहे. माझं दुखतंय मी राजीनामा देतोय, उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध? बरं झालं. मुख्यमंत्री आणि अजितदादांना कळालं माजोरडा आहे म्हणून. महाराष्ट्रातील मराठ्यांनाही कळायला हवं होतं. मराठ्यांनी सावध राहून त्यांना मोठं करू नये. मराठ्यांनी हातचं राखून काम केलं पाहिजे. या टोळीचा लोक नायनाट करतात.”
धनंजय मुंडे 302 मध्ये आहे
“सर्व चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. त्या आधी द्यायला हवा होता. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं. उशिरा का असेना पण अजितदादा आणि फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी लाथ घालून हाकललं. आपण मागणी केली. त्यांनी नैतिकता म्हणा आणि संस्कार म्हणा, आम्ही काल मागणी केली आज राजीनामा दिला. हे माज मस्ती करून आपलेच लोकं पाताळात घालणार. लोक त्यांना राहू देणार नाही. यांचा माजोरडापणा राहणार नाही. हे पैसेवाले झाल्यावर मस्तीखोर झाले. यांची अर्धी टोळी आत गेली. धनंजय मुंडे 302 मध्ये आहे म्हणजे आहे,” असा घणाघात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “मी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे मागणी करतो की पुरवणी तपास करा. पुरवणी तपासात सर्वांना सहआरोपी करा. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा. दोन ते तीन महिन्यात प्रकरण संपवा. या सर्वांना फाशी द्या. “आरोपी जो सरमाडे आहे. त्याने कबुल करावे की मी धनंजय मुंडेसाठी खंडणी मागितली आणि पाप केलं. त्याच्या कुटुंबानेही ते सांगावं. आतापर्यंत जेवढे खून केले ते मुंडेसाठीच केले. एक नंबरच्या आरोपीला सांगणं आहे, डोक्यावर पाप घेऊन फिरू नका. हा मजेत फिरेल. भाषणं करेल. त्याच्यासाठी केलं त्याचं नाव घ्या,” असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.