मेळघाटचे आमदार असलेल्या राजकुमार पटेल हे प्रहार संघटना सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहे. (फोटो - सोशल मीडिया)
अमरवती : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. अनेक नेते पक्षांतर करत असून वेगवेगळ्या पक्षांमध्ये सामील होत आहे. शरद पवार गटामध्ये सध्या इनकमिंगचं प्रमाण वाढलं आहे. मात्र आता शिंदे गट देखील पक्षप्रवेश वाढवण्याच्या तयारीमध्ये लागला आहे. शिंदे गटाच्या गळाला बडा नेता लागला आहे. विद्यमान आमदार व प्रहार नेते मेळघाटचे आमदार असलेल्या राजकुमार पटेल हे लवकरच शिंदे गटामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. पटेल यांनी याबाबत काही संकेत देखील दिले आहेत. त्यांनी एका आयोजित बैठकीमध्ये याबाबत संकेत देखील दिले आहेत.
राजकुमार पटेल यांनी विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे पोस्टर सर्व परिसरात झळकले आहे. या पोस्टरवर राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रोहित पटेल यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यावर फोटो आहे, पण आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांचा यात फोटो नसल्याने पटेल हे बच्चू कडूंवर नाराज आहेत का? असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. या पोस्टरची सध्या चर्चा सुरु आहे. राजकुमार पटेल यांनी पोस्टरवर प्रहार संघटना व बच्चू कडू यांचा कोणताही उल्लेख सुद्धा केलेला नाही. या उलट एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे.
हे देखील वाचा : तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला भरुन बडतर्फ करा…; ‘सामना’मधून टीकास्त्र
आगामी विधानसभेसाठी पटेल यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द दिला आहे. यंदाची विधानसभा ‘प्रहार संघटनेकडून न लढता शिवसेनेकडून लढण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. त्यामुळे राजकुमार पटेल हे लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात रंगल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे दोन आमदार निवडणून आले होते. यामध्ये एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे राजकुमार पटेल निवडून आले आहेत. आता मात्र राजकुमार पटेल हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या आधी तिसरी आघाडी बनवली असली तरी पक्षातील आमदाराने बच्चू कडू यांची साथ सोडली आहे. मागील निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पाठिंबा देत ते महाविकास आघाडीत सहभागी झाले. आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. त्यानंतर शिंदे गटाला समर्थन देत त्यांनी महायुती सरकारमध्ये सुद्धा सहभाग घेतला. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू नाराज होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी निर्माण केली आहे.