गेल्या दोन वर्षांपासून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश मस्के यांचा मीरा-भाईंदरमधील वावर अत्यंत मर्यादित राहिल्याची चर्चा स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. अनेक सामाजिक, पायाभूत आणि स्थानिक प्रश्नांवर खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठपुरावा केल्याचे उदाहरण फारसे समोर आले नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनतेशी थेट संपर्क कमी असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे जाणकार सांगतात. यासोबतच, शहरात खासदारांचे स्वतंत्र कार्यालय नसणे हा मुद्दाही वारंवार पुढे येत आहे.
स्थानिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ठोस व्यासपीठ उपलब्ध नसल्याने नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये दिसणाऱ्या उत्साहावर झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मीरा-भाईंदरमधील 146 विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा प्रभाव आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या भागात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत, खासदारांच्या वाढदिवशी एकही बॅनर झळकला नाही, ही बाब अधिकच लक्षवेधी ठरली आहे. सामान्यतः अशा प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर फलक लावून आपली निष्ठा आणि ताकद दर्शवतात. मात्र यंदा पूर्णपणे शांतता दिसल्याने गटबाजी, अंतर्गत नाराजी किंवा समन्वयाचा अभाव असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
काही जाणकारांच्या मते, स्थानिक पातळीवरील नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव, कार्यकर्त्यांमध्ये संवादाची कमतरता किंवा आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेली सावध भूमिका यामागे असू शकते. तर दुसरीकडे, काहीजण हेही मान्य करतात की, अलीकडील काळात प्रशासनाकडून बॅनरबाजीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचाही यावर परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही इतर नेत्यांच्या वाढदिवशी शहरात फलक झळकताना दिसतात, ही बाब या प्रकरणात अधिक प्रश्न निर्माण करते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर खासदार नरेश मस्के किंवा त्यांच्या अधिकृत कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यांच्या समर्थकांकडूनही मौन पाळले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात दिसलेली ही ‘शांतता’ नेमकी कोणत्या राजकीय संकेतांकडे निर्देश करते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.एकूणच, मीरा-भाईंदरमध्ये खासदारांच्या वाढदिवसानिमित्त दिसलेले ‘बॅनरलेस’ वातावरण हे केवळ योगायोग आहे की स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची नांदी, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






