पुण्यात रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा (फोटो सौजन्य:Chatgpt)
पुणे : विनातिकीट तसेच अयोग्य किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी तब्बल १५.४६ लाख प्रवाशांवर कारवाई करून १२१.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. म्हणजेच दररोज सरासरी सुमारे १३ हजार प्रवाशांवर कारवाई करत एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
गेल्या वर्षी याच कालावधीत १४.४२ लाख प्रकरणांतून ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा प्रकरणांच्या संख्येत सात टक्क्यांहून अधिक, तर दंडाच्या रकमेत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, जुलै २०२६ मध्ये २.६० लाख प्रवाशांवर कारवाई करून २०.१० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलै २०२५ मध्ये ३.०८ लाख प्रवाशांकडून १६ कोटी रुपये वसूल झाले होते. प्रवाशांची संख्या कमी झाली असली, तरी दंडवसुलीत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने स्थानकांवर, प्रवेश व निर्गमन मार्गांवर, गाड्यांमध्ये अचानक तपासणी तसेच ‘मेगा’ तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्यांसह मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरीय लोकलमध्येही तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांनी गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक ४९.५० कोटींचा दंड वसूल
विभागनिहाय विचार करता, मुंबई विभागात सर्वाधिक ७.४० लाख प्रकरणांतून ४९.५० कोटी रुपये, भुसावळ विभागात ३.०५ लाख प्रकरणांतून ३१.९९ कोटी, पुणे विभागात १.५७ लाख प्रकरणांतून १३.६२ कोटी, नागपूर विभागात १.८६ लाख प्रकरणांतून १३.७७ कोटी, सोलापूर विभागात ८१ हजार प्रकरणांतून पाच कोटी, तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून ७७ हजार प्रकरणांतून ७.४४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.



