
MLA Rohit Pawar Press Conference live on ajit pawar Accident marathi news
Rohit Pawar PC : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीमध्ये झालेल्या या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यावर आता संशय व्यक्त केला जात असून हा घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) पूर्ण सखोल चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या अहवालावर ताशेरे ओढले आहेत.
आमदार रोहित पवार यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की मी VSR किंवा DGCA च्या विरोधात नाही. पण अजित पवारांचा जो अपघात झाला ते विमान याच कंपनीचे होते. या अपघाताचे सत्य सर्वांसमोर यावे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. या विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. हा वाचवा वाचवीचा कार्यक्रम कोणत्या मोठ्या व्यक्तीमुळे केला जात आहे का? असे असेल तर अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता याचा तपास कधीच पूर्ण होणार नाही. योग्य रितीने तपास होणार नाही म्हणून मी हे बोलतो आहे.
हे देखील वाचा : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण
पुढे रोहित पवार यांनी अहवालामध्ये करण्यात आलेल्या चुकांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, विमान हे आधी सुरतला गेले होते हे आता रिपोर्टमध्ये आले आहे. इंधन क्षमतेच्या 90 टक्के इंधन हे भरलेलं होतं. नंतर या विमानाचे 85 तास उरले होते असे म्हटले होते. प्रत्यक्षात विमान उड्डाणाचे तीन हजार तास जास्त झाले होते, एवढं तरी सत्य समोर आलं आहे. दृश्यमानता कमी होती आणि मुख्य पालयट काहीच बोलत नव्हता हे देखील समोर आले आहे. कोणत्याही व्हीआयपी लोकांच्या अपघाताची आणि खास करुन विमान अपघाताची चौकशी केली जाते तेव्हा तपास यंत्रणेने डोळ्यात तेल घालून तपास करण्याची गरज असते, अशी देखील अपेक्षा रोहित पवारांनी बोलून दाखवली आहे.
हे देखील वाचा : समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी
त्याचबरोबर रोहित पवार यांनी विमानतळाची रेकी केली असल्याचा गंभीर दावा केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाही. कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता असल्याने नाव दिलं नसेल. २३ तारखेचा एआयबीचा रिपोर्ट आहे. त्यात इन्व्हेस्टिगेटींग करणाऱ्यांचं नाव आहे. पण अजितदादांच्या रिपोर्टमध्ये नाव नाही. अजितदादांबाबतच असा भेदभाव का?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.