
naresh mhaske on sanjay raut
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय, अशा अर्विभावात राऊत पतंगबाजी करत आहेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार म्हस्के म्हणाले की, शिवसेना हा एकसंध पक्ष असून पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले होते. त्यावरुनच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याचा राऊत यांनी अभ्यास करावा. सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आणि तत्व आपण विसरलात, असे खडे बोल खासदार म्हस्के यांनी राऊत यांना सुनावले. आज न्यायालयाचे कौतुक करायचे आणि निर्णय विरोधात गेला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने खडे फोडायचे, हा उद्योग राऊत करतात. त्यामुळे राऊतांच्या पतंगबाजीला काही अर्थ नाही, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
बाळासाहेबांचे विचार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. उबाठा गटातील शिल्लक माणसे थांबवण्यासाठी राऊत बेताल विधाने करत आहेत. आधी उबाठा गट सांभाळा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा, असा टोला खासदार म्हस्के यांनी राऊतांना लगावला. उबाठा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी राऊतांनी केलेली आहे. इतरांना विलीनीकरणाचे सल्ले देणारा उबाठा गटाला कदाचित एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी बोचरी टीका खासदार म्हस्के यांनी केली. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटातील शिल्लक आमदार, खासदार, नगरसेवक पक्षात कसे राहतील, याची काळजी करावी, असे खासदार म्हस्के म्हणाले. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राऊत वेळ पडल्यास काँग्रेसमध्येही प्रवेश करतील, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट