देश नक्की चाललाय कुठे?; पेपर लीक, बेरोजगारीवरून मुरली मनोहर जोशींचा केंद्राला घरचा आहेर
पेपर लीकच्या प्रश्नावर जोशी म्हणाले की, याचे एक मोठे कारण म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्याला नक्की कुठे जायचे आहे हेच ठरलेले नाही. शिक्षण रोजगाराशी जोडणे आवश्यक आहे. शिक्षण हे उत्पन्न मिळवून देणारे असले पाहिजे. शिक्षण तसे नसेल, तर त्याला काय म्हणायचे? उल्लेखनीय आहे की, नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेल्या जोशी यांची भाजपच्या ‘मार्गदर्शक मंडळात’ ठेवण्यात आले होते आणि अशा प्रकारे त्यांना सक्रिय राजकारणापासून दूर करण्यात आले.
जोशी म्हणाले की, आज दिल्लीत एम.ए. झालेली व्यक्ती नगरपालिकेत नोकरी आणि पीएच. डी. पदवीधर नगरपालिकेच्या कार्यालयात काम करत आहे. एकदा मला हे पाहून खूप वाईट वाटले की एक सफाई कर्मचारी बी.एड. झालेला होता, तो कंत्राटी पद्धतीवर २५-३० हजार रुपयांची नोकरी करत होता. मग हा देश नक्की चालला कुठे आहे?
आपल्या कार्यकाळाची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करताना जोशी म्हणाले, वाजपेयींच्या काळात मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात होते. आत्ता तर बँकांमध्ये घोटाळे होत आहेत, त्यामुळे शिक्षणातही घोटाळे होणारच, व्यापारात घोटाळे होत आहेत. सरकार स्थत घोटाळे करत आहे, मग तुम्ही या बिचाऱ्या विद्यार्थ्यांला का दोष देताय? तो तर घोटाळा करणारच.
भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…
शिक्षणावरील अर्थसंकल्पीय तरतूद आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्न उपस्थित करत मुरली जोशी यांनी प्रशासकीय धोरणांवर सडकून टीका केली. सर्वसाधारण अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च कमी होत आहे.
मागील वर्षांतील आकडेवारीचा पाहता शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यसेवेचा अर्थसंकल्प सातत्याने कमी होत असल्याचे दिसते. दुसरीकडे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेवरील खर्चात मोठी वाढ करण्यात आली. देशात किती व कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायचे याचा विचार नक्कीच व्हावा, मात्र कोणत्या खर्चात आणि कोणाला प्राधान्य द्यायचे याचा विचार होणे अधिक गरजेचे आहे, असा टोलही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.
मुरली जोशी म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यांच्यातील परस्परसंबंध अगदी स्पष्ट आहे. केवळ रस्ते बांधून विकास पूर्ण होत नसतो. रस्ते बांधण्यासाठी लागणारे अभियंते निर्माण करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये उभारणे ही काळाची गरज आहे. जर रस्ते बांधणीची यंत्रसामग्री परदेशातूनच मागवावी लागत असेल, तर अशा विकासाचा देशाला काय फायदा, असा सवालही जोशी यांनी उपस्थित केला.






