ncp leader sharad pawar press conference in baramati
बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यंदाची निवडणूकीमध्ये दोन महत्त्वाच्या युती आमने सामने असणार आहे. शरद पवार गट, ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी गोविंदबागेमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, “यंदाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे. लोकसभेमध्ये वेगळं चित्रं होतं. प्रधानमंत्री सांगत होते 400 च्या वर जागा येतील. पाच वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला होता. आता राष्ट्रवादीने ज्या 10 जागा लढल्या त्यातील 8 जागा निवडून आल्या आहेत. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठवरले होते. 1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली. काही लोक अशी असतात की आभाळकडे बघून पाऊस पडेल का नाही. पण आता कळायला लागले की पाऊस पडेल त्यामुळे गर्दी वाढली आहे,” असा टोला शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देत लगावला आहे.
पुढे आगामी विधानसभा निवडणूकीबाबत शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले. शरद पवार म्हणाले की, “विधानसभेबाबत लोकांमध्ये खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं आहे. आत्ताच्या निवडणूकीमध्येही चांगले निकाल लागतील यात शंका नाही. ही निवडणूक 3 लोकं एकत्र येऊन लढणार आहेत. निवडणूक आयोग तारीख ठरवेल. पुढच्या 8 ते 10 दिवसात हे काम संपले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन केली जाईल. यामध्ये संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांचा समावेश असेल. या तिन्ही नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे,” असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा अंदाज घेतला आहेत. यानंतर आता शरद पवार म्हणाले आहेत की, “माझा अंदाज आहे की 6 ते 10 च्या दरम्यान निवडणूक आयोग तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसांत जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. चर्चा करून जागा सोडली जाईल. नुसती सोडली जाणार नाही तर त्याचा प्रचार करून निवडूनही आणावे लागणार आहे,” अशी जाणीव शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना करुन दिली आहे.