
‘2029 ला तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढेन’; ओमराजे निंबाळकरांचा सूचक इशारा, शिंदेंची वाढणार डोकेदुखी?
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून ठाकरेंच्या सेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका विधानाने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. 2029 मध्ये लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेबाबत बोलताना स्पष्ट केले की, महायुतीत सहभागी झालो असलो तरी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार आहे.
यावेळी निंबाळकर म्हणाले की, “राज्यात काय होईल हे मला माहीत नाही. मात्र जिल्ह्यात मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. राणा पाटलांचे एकही मत मला नको. माझ्या खासदार निधीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 2019 ते 2024 या कालावधीतील निधीचा हिशोब तपासला पाहिजे. माझ्या कार्यकाळातील एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही.”
खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
त्यांनी खासदार निधीच्या वापराबाबतही स्पष्टीकरण देत विकासकामांसाठी निधीचा पूर्ण वापर केल्याचा दावा केला. ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी घेतलेली भूमिका.
“मला न्याय हवा होता म्हणून मी राजकारणात आलो. जर न्याय मिळाला नाही तर माझी पुढची भूमिका सर्वांना दिसेल. 2029 मध्ये जागा मिळाली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढेन,” असे त्यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर या विषयावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान, सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी ग्वाही दिली होती.
पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले होते, “सहाचे सहा खासदार शिवसेनेच्या तिकीटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील. ते पुन्हा निवडूनही येतील.”
‘मराठीची चिरफाड केली’; राहुल नार्वेकरांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेतील शोकप्रस्तावावरून संताप
मात्र, पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका दिवसात ओमराजे निंबाळकर यांनी तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा इशारा दिल्याने आगामी काळात महायुती आणि शिवसेनेतील अंतर्गत समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.