निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, 'पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,'
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण: महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबासाठी हा मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. अश्यातच आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत गंभीर दावा करत सुरुवातीच्या तपास यंत्रणांवर दबाव असल्याचे म्हटले आहे. न्यायालयात उपलब्ध असलेले पुरावे पुढे येतील आणि सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओमराजे निंबाळकर म्हणाले की, या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होती. मात्र त्या काळात तपास यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. “या प्रकरणाचा पहिल्यांदा तपास मुंबई पोलिसांकडे होता. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. त्यानंतर तपास सीआयडीकडे देण्यात आला. मात्र सीआयडीवरही दबाव असल्याचे आम्हाला जाणवत होते,” असे निंबाळकर यांनी सांगितले.
तपास निष्पक्ष व्हावा यासाठी 2008 मध्ये आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, असे निंबाळकर यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रकरणाचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात आला. “सुरुवातीच्या तपास यंत्रणांवर दबाव असल्यानेच आम्ही तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला,” असे ते म्हणाले.
‘मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?’; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
यावेळी भावनिक प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “हे कलियुग आहे. वाईटाला जास्त बळ असते, तर चांगल्याला उशिरा बळ मिळते. मात्र शेवटी सत्याचा विजय होतो, अशी आमची श्रद्धा आहे.” राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या या वक्तव्याने संबंधित प्रकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.






