सातारा : सातारा शहराच्या मध्यवर्ती भागातील राजपथावरील मोती चौक येथील दुभाजकाची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली असून, संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनाच्या धडकेने दुभाजकाचा काही भाग तुटला असून, अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
मोती चौक हा शहरातील वर्दळीचा परिसर असल्याने दिवसभर या मार्गावर वाहनांची मोठी ये-जा असते. त्यामुळे तुटलेला दुभाजक वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. त्यातच परिसरात होणारी वाहतूक कोंडी, फेरीवाले आणि व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.
देवी चौकाकडून राधिका चौकाच्या दिशेने जाणारी वाहने आणि जवाहरलाल बागेकडून येणाऱ्या वाहनांची या परिसरात मोठी वर्दळ असते. तुटलेल्या दुभाजकामुळे काही वाहनचालक त्याचा वापर अनधिकृत मार्गाप्रमाणे करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याच्या घटना घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी प्रायोजक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या दुभाजकामुळे यापूर्वी वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली होती. मात्र, दुभाजक तुटल्यानंतर त्याचा उद्देशच बाधित झाला आहे.
सातारा शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दुभाजकामुळे वाहनांची दिशा नियंत्रित होण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेलाही शिस्त लागते. त्यामुळे त्यांची देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“सातारकरांच्या मूलभूत प्रश्नांपैकी सुरक्षित वाहतूक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शहरातील दुभाजक उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. मोती चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी दुभाजकाची अशी अवस्था असणे निश्चितच भूषणावह नाही. तुटलेल्या दुभाजकाची तातडीने दुरुस्ती करून ‘सुंदर सातारा, विकासात्मक सातारा’ हे ब्रीदवाक्य कृतीत आणावे,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मोती चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या असतानाच शहरातील विविध चौकांमधील सिग्नल यंत्रणाही बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
सातारा नगरपालिकेला मोठी ऐतिहासिक परंपरा असून, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मोती चौकातील तुटलेल्या दुभाजकाची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करण्यासोबतच बंद सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






