
उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात
दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता मतदारसंघात सरळ आणि प्रतिष्ठेची लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील मुरूमकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला तिन्ही जिल्ह्यांतील महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. उस्मानाबाद, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे मतदान या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असून, दोन्ही आघाड्यांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीचा प्रचार अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीने बसवराज पाटील यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती आणि सत्तेचा फायदा मिळवण्याची रणनीती आखली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने महेश देशमुख यांच्यावर विश्वास ठेवत विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक नेत्यांचे समीकरण, गटबाजी, अपक्ष सदस्यांचा पाठिंबा आणि क्रॉस व्होटिंगची शक्यता महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ही लढत सरळ दिसत असली तरी अंतर्गत राजकीय हालचालींमुळे निकालात मोठे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात.
दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने प्रचार, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांच्या बैठका वाढण्याची शक्यता आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य कोणत्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.