महायुती आणि महाविकास आघाडीत होणार तुल्यबळ लढत
विधान परिषद निवडणुकीवरून राज्यात आता वारे वेगाने वाहू लागले आहेत. आज (सोमवार, १ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार उतरवले गेले असून अजूनही काही जागांवर उमेदवार निवडीवरून संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे.
महायुती तसेच महाविकास आघाडीत जागावाटपावरून अनेक चर्चा आणि बैठकी पार पडल्या. शेवटी आधी महाविकास आघाडीत जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर महायुतीतही जागावाटपावरून एकमत झाले. महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक आठ जागा, शिवसेना ठाकरे गटाला सहा जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती मध्येदेखील अनेक चर्चांनंतर जागावाटपात एकमत ठरले आहे. महायुतीत या जागावाटपात भाजपला सर्वाधिक अकरा जागा, शिवसेना शिंदे गटाला चार जागा तर राष्ट्र्वादी काँग्रेसला दोन जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर राष्ट्रवादिला मात्र अतिरिक्त एक जागा पदरात पडून घेण्यास यश मिळाले आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेही आपल्या आठ जागांवरील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर तीन जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे.
भाजप
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली – अरुण लखानी
भंडारा – गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – प्रवीण पोटे
सोलापूर – राजेंद्र राऊत
सांगली- सातारा – धैर्यशील कदम
अहिल्यानंगर – प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर – जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव – बीड – लातूर – बसवराज पाटील
जळगाव – नंदकिशोर महाजन
नागपूर – राजीव पोतदार
शिवसेना
ठाणे – रवींद्र फाटक
नाशिक – नरेंद्र दराडे
परभणी – हिंगोली – सईद खान
यवतमाळ – दुष्यन्त चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे
पुणे – विक्रम काकडे
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.






