
Parliament, Politics, Congress, BJP, Priyanka Gandhi, Rahul Gandhi, National News,
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून पळ काढत
असल्याचा आरोप केला. तर, भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी राहुल गांधी झारखंडला न जाण्यावरून आणि मौन बाळगण्यावरून सवाल उपस्थित केले. मंगळवारी सकाळी प्रियंका गांधी संसदेत पोहोचताच एनडीए खासदार हातात फलक घेऊन निदर्शने करत होते.
भाजप खासदार मुकेश दलाल यांनी राहुल झारखंडला का गेले नाहीत? असा सवाल केला. हे ऐकून प्रियंका थांबल्या आणि हसत त्यांनी फलकाकडे पाहिले. त्या म्हणाल्या, राहुल झारखंडच्या विद्यार्थ्यांना भेटले आहेत. तुमच्याकडून तर आता आंदोलन करून घेतले जात आहे.
मंगळवारी संसद परिसर रणांगण बनले होते. एकीकडे भाजप झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्दधावरून आक्रमक होती, तर विरोधक दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्ज, राम मंदिर दानचोरी आणि पेपर फुटीच्या मुद्दधावरून सरकारला घेरण्यात व्यस्त होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्या १७ दिवसांपासून अमित शाह लोकसभेत दिसले नाहीत ना राज्यसभेत, हे अभूतपूर्व आहे, सरकारमधील नंबर वन (मोदी) आणि नंबर टू (अमित शाह यांच्यात सर्व ठीक आहे ना?
दिल्लीत विद्याथ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून आतापर्यंत एनडीए बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. मात्र, झारखंडच्या घटनेनंतर भाजपने आघाडी उघडली आहे. भाजप खासदारांनी संसदेच्या मुख्य दारावर निदर्शने केली. एनडीए खासदार संसद ग्रंथालयाकडून ‘मकर द्वारा ‘च्या दिशेने मार्च करत राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करत राहिले. दुसरीकडे, प्रियंका गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारही आंदोलनाला उतरले. या दरम्यान दोन्ही बाजूंचे खासदार एकमेकांच्या खूप जवळ आले, परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्ये कडे करून प्रकरण शांत करावे लागले.