
bjp leader pravin darekar
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत जरांगेंना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून आणि कुणबी प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा तोफ डागली असून त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, “प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून वक्तव्य करणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रक्रियेत एखादे प्रमाणपत्र वैध किंवा अवैध ठरवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरण घेत असते. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा सरकारच्या इच्छेमुळे प्रमाणपत्र मंजूर अथवा रद्द होऊ शकत नाही. जर एखाद्याला निर्णय चुकीचा वाटत असेल, तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा…’, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका
मराठा आरक्षणाबाबत बोलताना दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा केला. “मराठा समाजाला ओबीसींसारख्या विविध सवलती देण्याचे निर्णय सरकारने घेतले असून, समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या विषयावर राजकीय भूमिका घेण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, ” असे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नार्को टेस्टची मागणी आणि सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. “वाईट करायला फारशी अक्कल लागत नाही; पण चांगले काम करण्यासाठी दूरदृष्टी आणि समज आवश्यक असते,” असे म्हणत त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या टीकेवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत “माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले” अशा प्रकारची विधाने करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस हे राज्यातील विविध समाजघटकांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले असून, कोणत्याही एका व्यक्तीमुळे त्यांना हे स्थान मिळालेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘सरकारचा हस्तक्षेप नाही’; मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना दरेकर यांनी उपरोधिक भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय नेतृत्व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या पाठिंब्याने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासामुळे घडले आहे. त्यामुळे अहंकाराची भाषा टाळून विषयापुरतेच बोलावे, असा सल्लाही त्यांनी जरांगे यांना दिला.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि कुणबी प्रमाणपत्रांबाबतचे वाद अद्याप कायम असून, या विषयावर सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवाद पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.