
Raj Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात कोकणातील विकासकामांवरून सरकारवर जोरदार टीका केली. माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प आणि कोकणातील जमिनींच्या व्यवहारांवरून सरकारला सवाल केले. विकासाला आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना, स्थानिकांच्या हिताला प्राधान्य नसेल तर असा विकास नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्यामुळे महामार्गाचं काम रखडल्याचं सांगितलं होतं. मात्र, कंत्राटदार नेमके का कंटाळले, याचाही विचार झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. महामार्गाचं काम पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होणाऱ्या वाहतूक कोंडीचाही त्यांनी उल्लेख केला.
“आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर या विकासाचा काय उपयोग?” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला. सरकारने सर्वप्रथम आपल्या नागरिकांचं हित पाहणं ही त्यांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे स्थानिकांच्या हितापेक्षा राजकीय पदांवरील वादांना महत्त्व देणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
कोकणात प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांना पुरेशी माहिती आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पामुळे परिसरात मोठे बदल होणार असतील तर स्थानिक तरुण-तरुणींना त्यासाठी आधीपासून तयार केलं जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रात भविष्यात कुठे काय होणार याची माहिती मिळते आणि त्यानुसार ते तयारी करतात; मात्र स्थानिक तरुणांना याची माहिती नसते, असा दावा त्यांनी केला.
जमीन हा कोकणातील स्थानिकांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी जमीन विक्रीबाबत सावध केलं. विकासकामं कुठे होणार आहेत याची माहिती काही लोकप्रतिनिधींना आधीच मिळते आणि त्यानंतर जमिनींचे व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि इतर स्थानिक नेत्यांचा उल्लेख करत जमिनींच्या व्यवहारांवर गंभीर आरोप केले. “कुठे विकास होणार हे आमदारांना आधीच माहीत असतं,” असा दावा करत काही लोकप्रतिनिधी आधी स्वस्तात जमिनी घेतात आणि नंतर त्या मोठ्या उद्योगपतींना विकतात, असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे कोकणातील विकास प्रकल्प, जमीन व्यवहार आणि ‘तिसरी मुंबई’चा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यांच्या आरोपांवर संबंधित नेते आणि सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.