
Raj Thackeray: 'मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,' राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) २०व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, पक्षाचे पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही औपचारिक सुरुवात करण्यात आली.
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचा उल्लेख करत, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अश्लाघ्य किंवा अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी याचवेळी भाजपच्या नेत्यांनाही आणि पक्षाच्या कथित ट्रोल यंत्रणेलाही भाषेच्या मर्यादा पाळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली.
“पंतप्रधानांनी सांगितले की त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या आईबद्दल अयोग्य भाषा वापरण्यात आली. ते चुकीचेच आहे. पण दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महात्मा गांधींपासून ते आजच्या विरोधी नेत्यांपर्यंत अनेकांविरोधात सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा उल्लेख केला. “ज्यांची डोकी फोडली, ज्यांच्यावर लाठ्या चालवल्या, त्या कारवाईचे आदेश देणारे कधी माफी मागणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, केवळ एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आंदोलन झाले नाही, तर तरुणांमध्ये निर्माण झालेल्या व्यापक असंतोषाचा तो उद्रेक होता.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, देशातील अनेक तरुण आणि विद्यार्थ्यांना सध्याच्या वातावरणामुळे रस्त्यावर उतरावे लागले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार हे आंदोलनाचे कारण असले, तरी त्यामागे तरुणांच्या मनातील नाराजी आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास अधिक मोठा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यावरही उपरोधिक टीका केली. त्यांच्या विधानामुळे तरुणांमध्ये अधिक नाराजी निर्माण होत असल्याचा दावा करत, शिक्षण क्षेत्रातील जबाबदार पदांवर असणाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, “मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला पुण्यात पाठवलं. जिकडे शिक्षणाचं माहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं… आता असे शिक्षणमंत्री म्हंटल्यावर GenZ चा पारा चढणार कि नाही चढणार ? हि अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत.”
राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विद्यार्थी प्रश्न, राजकीय भाषा आणि सत्ताधारी-विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप यावर चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.