
Rohit pawar slams Maharashtra Government over Police took action on protestors, Rohit pawar slams Maharashtra Government , Onion Farmers Protest,
आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून आता महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधत, “आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार भगरे गुरुजी तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे, आमदार रोहित पवार यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन करताना भाजपा सरकारवर सडकून टीका केली.
कांदा दरवाढीवरून निघालेले आंदोलन काहीच वेळात चिघळल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. काही आंदोलकांनी वगणांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यातच पोलीस आणि आंदोलक यात झटपट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी रोहित पवार, हर्षवर्धन सकपाळ, अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
आंदोलनात पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावरून आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. ते यावेळी म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?” असं प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“आम्हाला आज अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३ रुपये वाढवले आणि आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन मुंबईपासून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्या बैठका होणार आहेत, हे शेतकरी एकजुटीचे यश आहे,” असे ते म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का? आम्हाला आज अटक करून हा… pic.twitter.com/NF0MCE6cM4 — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2026
ते पुढे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नसून उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली लढाई तीव्र करतील आणि ते मात्र या सरकारला परवडणारे नसेल, हे या सरकारने ध्यानात घ्यावे.”