
साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले
सातारा : विधानसभा निवडणुकांनंतर सातारा जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने निर्माण केलेल्या वर्चस्वामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्येच जोरदार राजकीय चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यात आपापले राजकीय बस्तान मजबूत करण्यासाठी जोर लावला असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीवर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे.
राज्यात सत्तेत एकत्र असलेले पक्ष जिल्हा परिषद पातळीवर मात्र परस्परविरोधी भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने संख्याबळाचे गणित बिघडवत सत्ता हस्तगत केल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर “दडपशाहीचे राजकारण” केल्याचा आरोप करत समन्वय बैठकींना भाजपकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार पुन्हा एकदा नोंदवली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी व शिवसेना यांचा प्री-पोल अलायन्स आधीच जाहीर झाल्याने भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, “भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळेच आम्हाला एकत्र यावे लागले,” असा दावा देसाई यांनी केला आहे.
सभापती निवडीतही मतभेद ठळकपणे समोर आले. भाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून काही सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करण्यात आला, तर भाजपने मात्र आपल्या आक्रमक रणनीतीमुळेच सत्ता टिकवून ठेवली असल्याचे संकेत दिले. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आक्रमक धोरणामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत असून ते पालकमंत्री देसाई यांना रुचत नसल्याची चर्चा आहे. भाजपच्या या आक्रमक तंत्रामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आली नाही, परिणामी महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीकडून “सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू” असा इशारा देण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात राजकीय समीकरणे जुळवण्यात अपयश आल्याबाबत वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही साताऱ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून संघटनात्मक फेरबदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकांमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या राजकीय प्रभावाला अधिक अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई उभी ठाकली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी ‘सृजन यात्रा’च्या माध्यमातून पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी जिल्ह्यात ठोस नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसची स्थिती अजूनही कमकुवत असल्याचे दिसते.
राज्यात महायुतीतील सत्तासमीकरणे स्थिर असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी साताऱ्यातील वास्तव वेगळेच आहे. स्थानिक पातळीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले असून महायुतीत अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपने स्वबळावर लढत आक्रमक राजकीय डावपेच राबवले आणि त्याचा फायदा घेत सत्ता मिळवली, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, विरोधकांच्या मते हे “दडपशाहीचे राजकारण” असून पारंपरिक ‘यशवंत विचार’ बाजूला ठेवून नव्या पद्धतीची राजकीय संस्कृती रुजवली जात आहे. प्रत्यक्षात मात्र विरोधकांतील विस्कळीतपणा आणि अंतर्गत मतभेदही भाजपच्या यशाला कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Bombay High Court : “ऑफिसमध्ये महिलांकडे एकटक बघणं गुन्हा…”, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय