वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. यावरुन आता राज्यभरातून कारवाईची मागणी होत असून वैष्णवीला न्याय देण्याची भूमिका व्यक्त केली जात आहे. या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्याची घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावर मत व्यक्त करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आवश्यक पुरावे उपलब्ध झाले आहेत. वैष्णवीचा मृत्यू हा सामाजिक व कौटुंबिक दबावाचा परिणाम असून, ती एका अन्यायकारक व्यवस्थेची बळी ठरली. तिच्या पतीसह कुटुंबीयांनी केलेल्या मानसिक आणि सामाजिक छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले. तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान बाळ तिसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. इतक्या कालावधीतील अत्याचारानंतरही तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू न शकणे,” ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत, प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी, आणि तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी कार्यक्षम सरकारी वकील व अधिकारी नेमावेत,” अशी नीलम गोऱ्हे यांनी विनंती केली आहे.
पुढे गोऱ्हे म्हणाल्या की, “पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि वैष्णवीच्या मुलाच्या भविष्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. यासोबतच अशा घटना टाळण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. पोलिस विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, महिलांचे हक्क याबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचवले. आज सायंकाळी चार वाजता शिवसेना महिला आघाडीचे कांता पांढरे, मनीषा परांडे, सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बावधन पोलीस ठाण्यात भेट दिली असून, या घटनेमागील सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन पातळीवरही प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“या प्रकरणाचा मागील सहा महिने ते वर्षभर काळात गंभीर छळ झाला असून, त्याची दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती असून सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून पीडितेला गप्प बसवले जात असल्याची तीव्र शक्यता आहे. अशा घटना रस्त्यावर नव्हे तर घराघरातल्या सामान्य मुलींनाही भेडसावत आहेत, हे लक्षात घेता, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच “महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे. कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,” अशा शब्दांत नीलम गोऱ्हे यांनी महायुतीच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.