
Shivsena UBT leader Vasant More, NCP Sharad Pawar, Pune Vidhan Parishad Election, Congress,
वसंत मोरे यांनी याबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेण्याबाबत चर्चा झाली असेल तर ती आमच्यापर्यंत का पोहोचली नाही. आमच्या वरिष्ठांना देखील याबाबत काहीही माहिती नव्हती. राष्ट्रवादीने आम्हाला दोन वेळा दगा दिला. एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आणि आता विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने दगा दिला. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भाजपची आतून छुपी युती होती का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुणे विधानपरिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेससुद्धा शरद पवार गटावर नाराज असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचेच बंडखोर सुनील टिंगरे, भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने पुण्यातील निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर, काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. बुधवारी (३ जून) राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याशी मुबंईत भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुद्ध संताप व्यक्त केला असून आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी आधीपासूनच सांगत होतो कि आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारी अर्ज शेवटपर्यंत टिकायला हवे होते. पण, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकारच्या अट्टाहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी झाला. आज दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रमुख उमेदवारांना किमान २५ कोटी रुपये दिले आहेत. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला,” असे ते म्हणाले.