
विसरलेल्या भाषणावरून सुजात आंबेडकरांचा अमित ठाकरेंवर निशाणा !
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांना भाषण विसरल्यामुळे चालू भाषणातून व्यासपीठ सोडावे लागले होते. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा व्यासपीठावर येत त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी निशाणा साधत मोठे विधान केले आहे.
आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी, “अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो तरीही मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते,” असे विधान केले. या वक्तव्यातून त्यांनी आरक्षण, मेरिट आणि माध्यमांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण
सुजात आंबेडकर आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाले, “मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो.”
“बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे.”
मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे,… pic.twitter.com/Nx1g6QMJ1X — Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) August 3, 2026
“तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नाही.”
“आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मनविसेच्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांना भाषणादरम्यान काही क्षण व्यासपीठ सोडावे लागले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा व्यासपीठावर येत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, सुजात आंबेडकर यांच्या सोशल मीडिया पोस्टने या चर्चेला आणखी वेग दिला आहे. मात्र, त्यांच्या टीकेवर मनसे किंवा अमित ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.