
'पक्षात काही अतृप्त आत्मे, त्यांना पक्ष चांगला चाललेलं खूपत नाही,' सुनेत्रा पवार यांच्यावरील नोटिशीवर राष्ट्रवादीचा पलटवार
झारखंडमधील पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कायदेशीर नोटीस पाठवल्याचा दावा केला आहे. या घडामोडीनंतर पक्षात चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी यावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह? ज्येष्ठ नेत्याची कायदेशीर नोटीस
उमेश पाटील म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीविरोधात काही माध्यमांमध्ये बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र पक्षाच्या घटनेनुसार कोणताही आक्षेप असल्यास तो प्रथम पक्षांतर्गत मांडला पाहिजे. थेट न्यायालय किंवा नोटिशीचा मार्ग स्वीकारणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित नोटीस अद्याप पक्षाकडे प्राप्त झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गुप्तपणे झाली, हा आरोप त्यांनी फेटाळून लावत वरळी डोम येथे सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे सांगितले. तसेच भारत निवडणूक आयोगाने आवश्यक पडताळणी करून त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिल्यामुळे नोटिशीतील दाव्यांना कोणताही कायदेशीर आधार राहत नसल्याचा दावा त्यांनी केला.
सच्चिदानंद सिंह यांनी पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करत त्यांच्या प्रत्येक आक्षेपाला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही उमेश पाटील म्हणाले. पक्षात कोणताही अंतर्गत वाद नसून काही अतृप्त लोक प्रसिद्धीसाठी किंवा इतरांच्या सांगण्यावरून अशा प्रकारच्या हालचाली करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी सच्चिदानंद सिंह यांचे नाव अनेकांनी प्रथमच ऐकले असे सांगत, त्यांच्या मागे कोणाचा प्रभाव आहे का, त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला का किंवा त्यांना कोणी फूस लावली का, याचाही शोध घेतला जाईल, असा इशारा दिला.ते यावेळी म्हणाले, “पक्षात काही अतृप्त आत्मे आहेत. त्यांना पक्ष चांगला चाललेला खुपत नाही. पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर न जाता थेट नोटीस पाठवणे चुकीचे आहे. पवार कुटुंबाला आव्हान देण्याची ताकद महाराष्ट्रात कोणाचीही नाही” असे ते म्हणाले.
उमेश पाटील यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व एकमुखाने स्वीकारलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व असेल तरच भविष्यात निवडणुका जिंकू शकतो असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांना असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.