'सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?'; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात
विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. उपमुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आता यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून आता आमदार सुनील प्रभू यांनी हा धक्का मानण्यास नकार देत सचिन अहिरांवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार सुनील प्रभु यांनी सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना, “सचिन अहिर गेल्याने कसला धक्कातंत्र? वरळी हा आधीपासूनच आमचा बालेकिल्ला आहे. दिवंगत दत्ता नलावडे यांनी वरळीत शिवसेना उभी केली. त्यामुळे एका व्यक्तीच्या जाण्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “ठाकरे यांच्या शिवसेनेत एवढी महत्त्वाची पदे मिळाल्यानंतरही सचिन अहिर यांनी पक्ष का सोडला, याचे उत्तर त्यांनीच द्यावे.”
शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आणखी काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना त्यावरही सुनील प्रभु यांनी प्रतिक्रिया दिली.
“आमदार जाणार असल्याच्या बातम्या कुठून येतात, हेच मला समजत नाही. मी अनेक आमदारांशी सातत्याने संपर्कात आहे. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनीही सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला. “मतांची अॅडजेस्टमेंट करण्यासाठी ते आमच्या पक्षात आले होते. शिवसेनेत येऊन त्यांनी स्वतःची ताकद आणि बार्गेनिंग पॉवर वाढवली. जे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत, ते आमच्यासोबत कसे राहतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुनील शिंदे पुढे म्हणाले, “सचिन अहिर काय करणार आहेत, याची मला कल्पना होती. मात्र मी एक सामान्य कार्यकर्ता असल्याने त्यावर उघडपणे बोलू शकलो नाही. वरळीपुरते बोलायचे झाल्यास आमच्या वरिष्ठ नेतृत्वानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”
सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघातील राजकीय लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






