
मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या आणि राजकीय समीकरणांच्या चर्चांदरम्यान झालेल्या या भेटींमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्न मांडण्याची संधी यावेळी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उपयोग करून त्यांनी राज्याशी संबंधित विविध विषयांसाठी जवळपास दहा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. संबंधित विभागांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न हा या भेटींचा मुख्य उद्देश होता,” हे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना तटकरे यांनी ती केवळ सदिच्छा आणि मार्गदर्शनपर भेट असल्याचे सांगितले. या भेटींना कोणताही वेगळा राजकीय अर्थ लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदेंनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट, दिल्लीतून शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
यावेळी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचाही उल्लेख केला. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि टोल नाक्यांचा प्रश्न त्यांनी गडकरींसमोर मांडल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार 60 किलोमीटर अंतरावर टोल असावा, मात्र कोकणात काही ठिकाणी 40 किलोमीटरच्या अंतरावर टोल आकारला जात असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. या विषयावर गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती झाल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा कोणत्याही नियुक्तीची माहिती आपल्याला नसल्याचे सांगत, जर असा निर्णय झाला असता तर तो आपल्या माहितीत नक्कीच असता, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नेतृत्वाबाबत कोणताही मतभेद नसून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
पक्षातील नाराजीच्या चर्चांवर उत्तर देताना तटकरे म्हणाले की, “आपल्या राजकीय प्रवासाचा अनुभव आणि राज्यभरातील कामाची माहिती लक्षात घेतली तर अशा चर्चांना फारसे महत्त्व नाही. 1985 पासून सुरू झालेल्या आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून राज्यातील राजकारणाची सखोल माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले.