
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील 105 ग्रामपंचायतींची मुदत संपली; गावागावांत आखाडे रंगायला सुरुवात
वैजापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या मुदती ११ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गावखेड्यांतील आखाडे रंगायला सुरूवात झाली आहे.
तालुक्यात एकूण १३५ ग्रामपंचायती असून, यापैकी तालुक्यातील तब्बल १०५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपला आहे. विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार, प्रभागांची प्राथमिक रूपरेषा तयार करणे, हरकती-सूचना मागविणे, जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडून मंजुरी, तसेच अंतिम प्रभाग यादी प्रसिद्ध करणे असे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई
वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींचा यात समावेश असल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या दृष्टीने विविध पक्ष, स्थानिक आघाड्या व इच्छुक उमेदवारांनी गावपातळीवर संपर्क मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी आरक्षण, प्रभाग रचना आणि उमेदवारी यावरून चर्चाना सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू
ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे बदलणाऱ्या ठरतात. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकापाठोपाठ झाल्याने नेतेमंडळींचा ‘थकवा’ जात नाही तोच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू झाल्याने नेत्यांसह गावपुढाऱ्यांना पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा ‘डोळा’
तालुक्यातील शिऊर, खंडाळा, लासूरगाव, महालगाव, पालखेड, लोणीसारख्या (खुर्द) मोठ्या ग्रामपंचायतींवर सर्वच राजकीय पक्षांचा ‘डोळा’ असणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काही राजकीय पक्षांना वातावरण अनुकूल होते तर काही पक्षांची पिछेहाट झाली. ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षांच्या बॅनरवर लढवली जात नसली तरी निवडणुकीत पॅनल राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन उतरतातच. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची खेचाखेची या निवडणुकीतही पाहावयास मिळणार आहे.
भरउन्हाळ्यात तापणार राजकारण
वैजापूरमधील १०५ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी, गटबाजी, पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत. आरक्षण आणि प्रभाग रचना यावरूनही स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या ठरणार असून ग्रामपातळीवरील नेतृत्वात मोठे बदल दिसू शकतात.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा