
महाआघाडीत पडली वादाची ठिणगी; सोमवारी मातोश्रीवर बैठक
चंद्रपूर : चंद्रपुरातील महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा विषय महापौरपदाच्या निवडणुकीच्या ४ दिवसानंतरही चर्चेत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही असे ठरवले असताना चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने युती केली आणि ‘उबाठा’ गट सत्तेत सहभागी झाला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही, असा थेट आरोप केला आहे. या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत. हा पक्षाचा किंवा उद्धव ठाकरे यांचा निर्णय नाही. हा सर्व प्रकार स्थानिक नेत्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल, असे सांगत संजय राऊत यांनी आपण युतीचे समर्थन करत नसल्याचे जाहीर केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. या सर्व चर्चांना विराम देण्यासाठी आता चंद्रपूर मनपातील सत्तारूढ शिवसेना ठाकरे गट व शिवसेना पदाधिकारी सोमवारी मुंबई येथे मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
दरम्यान, तुमचेच नेते आपसात भांडत होते. प्रदेशाध्यक्षांनी दिलेला फॉर्म्युलादेखील काँग्रेस नेते मान्य करायला तयार नव्हते. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे नगरसेवकांचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच होती. मात्र, शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत नव्हते, असे सांगून त्यांनी या स्थितीसाठी काँग्रेसलाच जबाबदार धरले. तत्पूर्वी, चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेने दगा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले होते. याचे परिणाम उद्धव सेनेला भोगावे लागतील.
संजय राऊतांच्या काँग्रेसला कानपिचक्या
परभणीत ठाकरे सेनेला सत्ता स्थापन करण्याची गरज भासणार आहे. त्यावेळी आम्ही वचपा घेऊ, असा इशारा सपकाळांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात परभणीत उपमहापौरपद घेऊन काँग्रेसने ठाकरे गटासोबत सत्तेत सहभागी झाली. आम्ही युती धर्म पाळला, असेही सपकाळांनी यावेळी जाहीर केले.
वरुण सरदेसाई नगरसेवकांच्या संपर्कात
दरम्यान, चंद्रपूरमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबत पक्षातील एक वेगळाच नेता वाटाघाटी करत होता. आ. वरुण सरदेसाई हे नगरसेवकांच्या संपर्कात होते, असे आता समोर आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून, हा सर्व प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याचे सांगितले जाते.