
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाचा शिवसेना वर्धापन दिन मेळावा
शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली खळबळ, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे मेळावे यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट स्वतंत्रपणे वर्धापनदिन साजरा करणार आहेत अश्यातच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत असल्याने या भाषणाकडे विशेष लक्ष लागले आहे.
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत ते म्हणाले, “आज अनेकांना वाटलं होतं, आजच्या मेळाव्याला खचून गेलेला शिवसैनिक येईल. मात्र हा खचून गेलेला नाही तर पेटलेला शिवसैनिक आहे. संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हा सोहळा पाहात आहेत. भाजप आहे कुठे? त्यांना संसदेत दोन तृतीयांश बहुमत नाही,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “30 वर्षे आम्ही भाजपसोबत होतो. या 30 वर्षात त्यांच्यासोबत विलीन झालो नाही, तर आता काँग्रेसमध्ये कसे होणार? भाजपचं आता एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार आहे. माझ्यावर टीका होत आहे. आदित्यवर घाणेरडे आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंना दुसऱ्याचे बाप चोरावे लागत आहेत.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण चार खासदारांचा सत्कार तर केलाच आहे, पण त्यासोबतच आपले हक्काचे 20 आमदार आणि अनेक नगरसेवक अजूनही खंबीरपणे सोबत उभे आहेत. ज्या वेळेपासून आपण आपले यश – अपयश हे केवळ निवडणुकीच्या निकालासोबत तुलना करायला लागतो, तिथेच आपण फसतो, असं माझं स्पष्ट मत आहे. शिवसेनाप्रमुखांसोबत पहिली नेत्यांची फळी ज्या वेळी होती, ज्यांनी पक्षासाठी अतोनात कष्ट घेतले. ते निष्ठावंत आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहेत,” असे ते म्हणाले.
“लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. मला चिंता वाटते कि, जर हे असेच चालू राहिले तर देश अराजकतेकडे जाऊ शकतो. माझ्या आवाहनाला आणि बाळासाहेबांच्या नावाला प्रतिसाद देत या मतदारांनी आम्हाला मतदान केले होते. मोदींचे नाव न वापरता आम्ही या नऊ जागा जिंकल्या होत्या.”