
फोटो सौजन्य- pinterest
दहीहंडीची परंपरा बाललीलांशी जोडलेली आहे. असे मानले जाते की भगवान कृष्णाला लोणी आणि दही खूप आवडत असे. लहानपणी ते आपल्या मित्रांसोबत गोकुळात फिरत असत. जेव्हा कधी त्यांना एखाद्या घरात लोणी आणि दह्याचे भांडे दिसे, तेव्हा ते पाहताच ते चोरून नेत असत. त्यांच्या या खोडसाळपणामुळे गोपींना त्रास होऊ लागला. असे म्हटले जाते की, कृष्णापासून लोण्याचे रक्षण करण्यासाठी गोपींनी ती भांडी जमिनीपासून उंच टांगायला सुरुवात केली. पण खोडकर कृष्ण हार मानणार नव्हता. तो आपल्या मित्रांना एकत्र जमवून एकावर एक चढून मानवी मनोरा तयार करत. जो कोणी शिखरावर पोहोचेल तो भांडे फोडेल आणि मग सर्वजण एकत्र लोणी आणि दही खात असतं.
लोकपरंपरेनुसार, श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी घरातील उंचावर ठेवलेली दही-लोण्याची मडकी फोडून त्यातील पदार्थ खात असत. या बाललीलेचे स्मरण म्हणून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. उंचावर मडके बांधले जाते आणि गोविंदांचे पथक मानवी मनोरा तयार करून ते मडके फोडते. यातून श्रीकृष्णाच्या बाललीलेचे प्रतीकात्मक दर्शन घडते. तसेच एकत्र येऊन मडके फोडताना संघभावना, धाडस आणि एकजुटीचा संदेशही दिला जातो.
दहीहंडी उत्सव विशेषतः महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या उत्सवादरम्यान उंच दहीहंडी बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी वेगवेगळे संघ तयार केले जातात आणि जो संघ दहीहंडी फोडतो त्याला विशेष बक्षीस दिले जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाल्याचे मानले जाते. त्यामुळे त्या दिवशी प्रामुख्याने कृष्णजन्माचा उत्सव, पूजा आणि धार्मिक विधी केले जातात. त्यानंतरच्या दिवशी बालकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करत दहीहंडी किंवा गोपाळकाला साजरा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी रूढ झाली आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवसाला ‘गोपाळकाला’ असेही म्हटले जाते. कृष्ण आणि त्याच्या गोपाळ मित्रांनी एकत्र केलेल्या काला या पदार्थाच्या कथेशीही ही परंपरा जोडली जाते.
दही, दूध, लोणी, पोहे, फळे आणि विविध पदार्थ एकत्र करून तयार केला जाणारा काला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून कृष्णभक्ती आणि त्याच्या बाललीलांचे स्मरण करण्याचा दिवस मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)