फोटो सौजन्य- pinterest
महाराष्ट्रात गौरीपूजनाची विविध रूपे पाहायला मिळतात. कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांकडे खड्यांच्या गौरी असतात. नदीकाठून पाच किंवा सात गुळगुळीत खडे आणून त्यांची पूजा केली जाते. माहेरवाशीण किंवा कुमारिका गौर घरी आणते. उंबरठ्यावर तिचे औक्षण करून, रांगोळीच्या पावलांवरून घरात नेले जाते. घरातील प्रत्येक खोलीत तिला फिरवून स्वयंपाकघर, धनधान्य, दागदागिने, पुस्तकांचे कपाट अशा घरातील संपन्नतेच्या वस्तू दाखवल्या जातात. ‘इथे काय आहे?’ या प्रश्नावर ‘उदंड आहे’ असे उत्तर दिले जाते. आगमनाच्या दिवशी खिरीचा, दुसऱ्या दिवशी घावन-घाटल्याचा किंवा पुरणावरणाचा आणि निरोपाच्या दिवशी करंजीचा नैवेद्य दाखवला जातो.
देशस्थांच्या घरी उभ्या गौरी असतात, तर विदर्भात त्यांना ‘महालक्ष्मी’ म्हटले जाते. पितळ, चांदी किंवा इतर साहित्याचे मुखवटे धान्याच्या राशींवर ठेवून माहेरवाशिणी त्यांना घरी आणतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींची स्थापना केली जाते. त्यांना साडी, दागदागिने आणि अलंकारांनी सजवले जाते. महापूजेच्या दिवशी सोळा प्रकारच्या पत्री, फुले, विविध भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. विदर्भातील आंबिलीही या नैवेद्याचे वैशिष्ट्य आहे. निरोपाच्या वेळी ‘मम गृहे स्थिरा भव’अशी प्रार्थना केली जाते.
कोल्हापूर परिसरात तांब्यावरच्या गौरींची परंपरा आढळते. कोकणातील सारस्वत समाजात गौरीला गणपतीची आई मानून महादेवासह तिचे आगमन गणेशोत्सवापूर्वीच होते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. लोकांकडे तेरडा आणि खडयांच्या गौरी पूजल्या जातात. माहेरवाशीण ही गौर घरात आणते. तेरडा आणि सात खडे सुपात घेऊन आलेल्या माहेरवाशिणीच्या पायावर दूध-पाणी घालून, तिला ओवाळून घरात घेतलं जातं. कुंकवाचं पाणी केलेल्या परातीत पावलं बुडवून मगच तिनं घरात यायचं असतं. संपूर्ण घरात काढलेल्या रांगोळीच्या पावलांवरून लाल पावलांचे ठसे उमटवत माहेरवाशीण चालू लागते. गृहलक्ष्मी प्रत्येक खोलीत तिचं औक्षण करते, हातावर साखर ठेवून विचारते, ”गौरी, गौरी कुठे आलीस?” मग गौर उत्तरते, अशा रीतीने सगळं घर पाहून झालं की मग गणरायाच्या शेजारी गौर बसवली जाते. मग तिला मुखवटा लावून साडीचोळी नेसवून शृंगारण्यात येतं. सौभाग्यवाणासह खणानारळाने गौरीची ओटी भरण्यात येते. पहिल्या दिवशी खीर, भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तिसऱ्या दिवशी खीर आणि मुरड घातलेला कान्होला नैवेद्याला असतो.
कोकणातील शेतकरी समाजात तेरड्याच्या पानांची प्रतिमा करून त्यावर मातीचा मुखवटा बसवला जातो. बहुजन समाजात मातीच्या मडक्यांची उतरंड रचून गौरीची पूजा केली जाते. कोकणस्थ मराठा समाजात हळदीचा खांब आणि गौरीचा मुखवटा विहिरीवर नेऊन पूजा करून वाजतगाजत घरी आणण्याची प्रथा आहे.
गौरीपूजेच्या या विविध परंपरांमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडते. पूजा, नैवेद्य, रूप आणि विधी बदलले तरी तिच्या स्वागतामागची भावना मात्र एकच माहेरपणाला आलेल्या या जगन्मातेला प्रेमाने, सन्मानाने आणि आपुलकीने निरोप देणे. म्हणूनच गौरी म्हणजे केवळ पूजेची देवता नाही; ती प्रत्येक घरातील लेक, माऊली आणि समृद्धीचे मंगल प्रतीक आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






