
World Tiger Day: वाघ वाढले अन् आता जंगल कमी पडतेय! व्याघ्रसंवर्धनाचे यश की सहअस्तित्वाची नवी परीक्षा?
वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे अधिवास वाढलेले नाहीत”
महाराष्ट्राने व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवले
जंगलातील परिसंस्था होतेय अधिक सक्षम
सुनयना सोनवणे /पुणे: कधीकाळी वाघ वाचवण्याची चिंता होती. आज त्यांच्यासाठी जंगल वाचवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाचे हे यश जितके अभिमानास्पद आहे, तितकेच ते नवे प्रश्नही निर्माण करते. वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे अधिवास मात्र वाढलेले नाहीत. परिणामी, जंगलाबाहेर पडणारे वाघ आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष हे संवर्धनासमोरील नवे वास्तव बनले आहे.
चिखलातील पंजांचे ठसे आता केवळ जंगलापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते गावांच्या वेशीपर्यंत पोहोचत आहेत. काही वर्षांपूर्वी अपवाद असलेले हे चित्र आता महाराष्ट्रातील अनेक भागांत दिसते. व्याघ्रसंवर्धनाच्या यशाची ही खूण असली, तरी त्याचबरोबर नव्या संघर्षाची चाहूलही आहे.
महाराष्ट्राने व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवले आहे. २०१८ मध्ये राज्यात ३१२ वाघ होते. २०२२ च्या व्याघ्र गणनेत ही संख्या ४४४ वर पोहोचली. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतील संरक्षण, शिकारीवर नियंत्रण आणि अधिवास व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले. ही वाढ केवळ आकडेवारी नाही, तर जंगलातील परिसंस्था अधिक सक्षम होत असल्याचे द्योतक आहे.
मात्र प्रत्येक वाघाला स्वतःचे स्वतंत्र क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे संख्या वाढताच तरुण वाघ नवीन अधिवासाच्या शोधात जंगलाबाहेर पडतात. अनेकदा त्यांचा मार्ग शेती, गावांच्या वेशी आणि रस्त्यांमधून जातो. विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पाळीव जनावरांवरील हल्ले, मानवी जीवितहानी आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे, रस्ते अपघात, रेल्वेमार्ग, विषबाधा आणि अधिवासाचे तुकडीकरण यामुळे वाघांच्याही अस्तित्वावर धोका निर्माण होत आहे.
आज व्याघ्र संवर्धन केवळ जंगलापुरते मर्यादित राहिलेले नाही. जंगलातील प्रत्येक हालचालीवर आता तंत्रज्ञानाची नजर आहे. कॅमेरा ट्रॅप वाघांची ओळख पटवतात, रेडिओ कॉलर त्यांच्या स्थलांतराचा मागोवा घेतात, ड्रोन दुर्गम भागांवर लक्ष ठेवतात, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हजारो छायाचित्रांचे विश्लेषण करून संभाव्य संघर्षग्रस्त क्षेत्रांचा अंदाज देते. त्यामुळे संवर्धन अधिक वैज्ञानिक आणि परिणामकारक होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, व्याघ्र संवर्धनाचा पुढील टप्पा म्हणजे केवळ ‘संख्यावाढ’ नव्हे, तर ‘सहअस्तित्व’ आहे. जंगलातील अधिवास वाढवणे, वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण, स्थानिकांना वेळेवर नुकसानभरपाई, जनजागृती आणि विकासकामांमध्ये पर्यावरणीय नियोजन यांवर भर दिल्याशिवाय संघर्ष कमी होणार नाही.
‘व्याघ्रसंवर्धनाचे खरे यश वाघांची संख्या मोजण्यात नाही, तर त्यांना सुरक्षित जंगल आणि माणसाला सुरक्षित आयुष्य देणारे सहअस्तित्व निर्माण करण्यात आहे. अन्यथा प्रत्येक व्याघ्र गणनेत वाढणारे आकडे आनंद देतील; पण गावाच्या वेशीवर उमटणारे पंजांचे ठसे नव्या संघर्षाची आठवण करून देत राहतील.’
– उत्कर्ष पाटील, वन्यजीव अभ्यासक
व्याघ्रसंवर्धन एका नजरेत –
भारतातील एकूण वाघ (२०२२) : ३,६८२
जगातील जंगली वाघांपैकी भारतातील वाटा : सुमारे ७५%
भारतातील व्याघ्र प्रकल्प : ५८
व्याघ्र राखीव क्षेत्र : ८२,८३६ चौ. कि.मी. (देशाच्या सुमारे २.५% भूभाग)
वाघसंख्येत आघाडीची राज्ये (२०२२)
* मध्य प्रदेश – ७८५
* कर्नाटक – ५६३
* उत्तराखंड – ५६०
* महाराष्ट्र – ४४४
* तामिळनाडू – ३०६
महाराष्ट्रातील वाघसंख्या
* २०१४ – १९०
* २०१८ – ३१२
* २०२२ – ४४४
* २०१८ ते २०२२ वाढ – सुमारे ४२%