
Pune Postal Service
वानवडी विभागात कार्यरत असलेले पोस्टमन विजय बबन दांडेकर सांगतात, “टपाल खात्यात ३५ वर्षे झाली. त्यापैकी १९ वर्षे पोस्टमन म्हणून काम करतोय. आधी सायकलवरून पत्र वाटायचो, आता दुचाकी आली; पण कष्ट काही कमी झालेले नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी पत्रं पोहोचवताना लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच आमच्या कामाची खरी पावती असते.”
दररोज ७० ते ८० पत्रे आणि पार्सल पोहोचवण्यासाठी पोस्टमनना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. वाढते तापमान, पावसाळ्यातील अडचणी, वाहतूक आणि कामाचा वाढता ताण यामुळे त्यांचे जीवन अधिक कष्टमय बनले आहे. तरीही लोकांच्या सुख-दुःखाच्या बातम्या वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
कोथरूड टपाल विभागातील पोस्टमन उषा जगताप सांगतात, “सकाळी कार्यालयात गेल्यावर टपालाची छाननी करावी लागते. त्यानंतर विभागनिहाय पत्रांचे वाटप होते आणि आम्ही वितरणासाठी बाहेर पडतो. उन्हामुळे खूप त्रास होतो, थकवाही येतो; पण वेळेत सेवा पोहोचवणे गरजेचे असते. नागरिकांकडून मिळणारे कौतुक आमच्यासाठी मोठे बळ असते.”
पुण्यातील पोस्टमन आज केवळ पत्रवाटप करत नाहीत, तर स्पीड पोस्ट, आधार सेवा, बचत योजना, विमा सेवा आणि पार्सल वितरण यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बदलत्या काळातही टपाल विभागावरील लोकांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येते.
भारतात आधुनिक टपाल सेवेची अधिकृत सुरुवात १८५४ मध्ये झाली. पुणे जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) इमारतीची उभारणी सुमारे १८७२ मध्ये ब्रिटिश काळात करण्यात आली. पुणे जीपीओसमोर असलेला ‘झिरो माइल स्टोन’ किंवा ‘झिरो किलोमीटर दगड’ हा शहरातील अंतर मोजण्याचा मूळ संदर्भबिंदू मानला जातो. या दगडापासून इतर शहरांचे अंतर मोजले जात असे.
हा दगड ब्रिटिशांच्या ‘ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ मोहिमेचा भाग होता. देशभरात अशा सुमारे ८० झिरो माइल स्टोन उभारण्यात आले होते. पुणे टपाल विभागात पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असून, या विभागात २,१८३ शाखा टपाल कार्यालये, ४८६ उपटपाल कार्यालये आणि १० मुख्य टपाल कार्यालये कार्यरत आहेत.
पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जयभाये म्हणाले, “डिजिटल युगात टपाल विभागाने स्वतःमध्ये मोठे बदल केले आहेत. पारंपरिक पत्रसेवेसोबतच आता पार्सल, आधार सेवा, आर्थिक सेवा आणि डिजिटल व्यवहार यांवर अधिक भर दिला जात आहे. मात्र, या सगळ्या बदलांमध्ये पोस्टमन हा नागरिक आणि टपाल विभाग यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आजही कायम आहे.”