
Sudhakarrao Naik
water conservation day: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा आज (१० मे) स्मृतीदिन असून हा दिवस महाराष्ट्र सरकारने ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘जलनायक’ म्हणून ओळख मिळाली.
सुधाकरराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील पुसदम येथील गहुली गावात झाला. त्यांचे वडील लोकनेते बाबासाहेब नाईक हे अत्यंत कडक शिस्तीचे तर काका वसंतराव नाईक हे मायाळू स्वभावाचे होते. लहानपणापासूनच अशा जेष्ठांच्या तालमीत सुधाकरराव नाईक यांनी राजकारणाचे धडे गिरवले असल्याने पुढे त्यांनी १९९१-९३ काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले.
सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता. परंतु, जलसंवर्धन करण्यासाठी कोणत्याही योजना आणि पुरेसा निधी नसल्याने जलसंधारणाची कामे होत नव्हती. या काळातच जमीनीतील पाण्याची पातळी खूपच खालावली होती. या परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील जनतेला येत्या पाच ते दहा वर्षात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते याचा अंदाज बांधून त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केली. तसेच इतर योजनांमधील निधी जलसंधारणाकडे वळवला. त्यामुळे त्या काळात अनेक ठिकाणी जलसंवर्धनाची कामे यशस्वी झाली.
स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती केल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे करून भूजलपातळी वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जलचळवळ सुरू केली. तसेच जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल असा इशारच त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचा स्मृतिदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात फक्त धरणं न बांधता पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याच्या उपाययोजना अंमलात आणल्या. जमिनी सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. याच्या धाडसी प्रयत्नांमुळेच त्यांना ‘पाणीदार नेता’ म्हणून देखील ओळखले जाते.