IND VS BAN: BCCI cancels Bangladesh tour! Banned from playing T20 and ODI series till 'this' year..
BCCI cancels Bangladesh tour : भारत बांगलादेश दौऱ्यावर जाणार होता, परंतु त्यापूर्वीच हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तथापि, तो एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे औपचारिकपणे सांगण्यात आले आहे. बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डकडून संयुक्त निवेदन देणे अपेक्षित आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या राजनैतिक परिस्थिती पाहता, बीसीसीआयकडून बांगलादेश दौऱ्यावर संघ न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार होता. १७, २० आणि २३ ऑगस्ट रोजी तीन एकदिवसीय सामने आणि २६, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी तीन टी-२० आंतरराष्ट्रीय समन्यांचे आयोजन करण्यात आले होते. हे सामने मीरपूर आणि चितगाव येथे खेळवण्यात येणार होते. पण आता ही मालिका सप्टेंबर २०२६ पर्यंत खेळवली जाणार नसल्याचे समोर आले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, ते सप्टेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी भारताचे स्वागत करणार आहे. दौऱ्याच्या नवीन तारखा आणि वेळापत्रक वेळेवर जाहीर करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी दौऱ्याबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेवर भाष्य केले होते. आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचे अव्वल खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे. जी भारतीय स्थानिक हंगामाची सुरुवात असणार आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ही एकदिवसीय मालिका खेळणार होते. २०२४ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर दोन्ही अनुभवी खेळाडूंकडून टी-२० मधूनही निवृत्ती जाहीर करण्यात आली होती. आता कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर, एकदिवसीय हा एकमेव प्रकार शिल्लक आहे ज्यामध्ये हे दोन दिग्गज खेळत आहेत. तथापि, दौऱ्याच्या नवीन तारखा निश्चित झाल्यावर त्यांना संघात समाविष्ट करण्यात येईल की नाही याबाबत अद्याप काही एक स्पष्ट झालेले नाही.