IND vs SL भारताचा विजय सोपा नक्कीच नाही (फोटो सौजन्य - Instagram)
भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी असे संकेत दिले आहेत की, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवले जाऊ शकतात. कारण कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे गोलंदाजीतील वेगवेगळे प्रकार आणि विकेट घेण्याची क्षमता आहे. कुलदीप आपल्या डावखुऱ्या मनगटी फिरकीने फलंदाजांना चकवण्याची क्षमता ठेवतो, जडेजाची अचूक गोलंदाजी सर्वोत्तम फलंदाजांनाही अडचणीत आणू शकते, तर सुथारची गोलंदाजी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या पारंपरिक शैलीची आठवण करून देते.
मॉर्केल माध्यमांना म्हणाले की, ‘आमच्यासोबत कुलदीप आहे आणि तो एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला वाटते की ते सर्व आपापल्या शैलीने वेगळे आहेत. मानव चेंडूला थोडा जास्त वळवतो, तर, जडेजा थोडा जास्त अचूक आहे, आणि मला वाटत नाही की तीन डावखुरे फिरकी गोलंदाज असणे ही आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे.’
मॉर्केल पुढे म्हणाले की ‘जर या मैदानाचा इतिहास पाहिला गेला तर येथे सामने कसे खेळले गेले आहेत हे पाहता, मला वाटते की तीन फिरकी गोलंदाजांना संधी देणे हाच योग्य मार्ग आहे. आमच्या फिरकी गोलंदाजीचा विचार करता, हा एक खूप आक्रमक पर्याय आहे. पण खेळपट्टी पाहता, ती एक चांगली खेळपट्टी दिसते आणि माझा विश्वास आहे की कसोटी जसजशी पुढे जाईल, तसतसे त्यात काही बदल होतील. परंतु, हे कर्णधार शुभमन गिल विशिष्ट वेळी या गोलंदाजांचा कसा वापर करतो यावर अवलंबून असेल. पण कौशल्याच्या बाबतीत, त्या सर्वांमध्ये आमच्यासाठी २० विकेट घेण्याची क्षमता आहे.’
मॉर्केल यांनी सांगितले की, ‘संघाने सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयारी केली असून, अशा परिस्थितीत मानसिक क्षमता, दीर्घकाळ फलंदाजी करणे आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे महत्त्वाचे ठरेल. वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत मॉर्केल चिंतित दिसले नाहीत. ते म्हणाले की, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी देशांतर्गत स्तरावर कठीण परिस्थितीत भरपूर क्रिकेट खेळले आहे. येथे त्यांना, तीव्र उष्णता, आर्द्रता आणि कुकाबुरा चेंडूचा मऊपणा ही खरी आव्हाने असतील.’



