
विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक! वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट (Photo Credit- Instagram)
रिंकू सिंहचे वडील प्रदीर्घ काळापासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. दुर्दैवाने, २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर रिंकू काही दिवस घरी होता, मात्र देशाप्रती असलेले कर्तव्य निभावण्यासाठी तो ‘सुपर-८’ फेरीपूर्वी भारतीय संघात दाखल झाला. वडिलांच्या निधनाचे दुःख आणि डोळ्यांत त्यांचे स्वप्न घेऊन रिंकू मैदानावर उतरला होता.
रिंकूने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे. त्याने म्हटले की, “बाबा, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी इतके दिवस कधीच काढले नव्हते. आता तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जगायचं, हे मला माहीत नाही. पण मला माहिती आहे की, मला प्रत्येक वळणावर तुमची आठवण आणि मार्गदर्शन लागेल. तुम्हीच शिकवलं होतं की कर्तव्य सर्वात आधी असतं, म्हणूनच मी मैदानावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत होतो.”
तो पुढे लिहितो, “तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, आपण विश्वविजेते झालो आहोत; पण फक्त तुम्ही सोबत असायला हवे होतात असं वाटतंय. आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या आनंदात तुमची उणीव भासेल. तुमची खूप आठवण येईल पापा!”
२०२६ च्या या विश्वचषकात रिंकू सिंहला ५ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र, वैयक्तिक दुखवटा आणि परिस्थितीमुळे त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत तो केवळ २४ धावा करू शकला. यापूर्वी २०२४ च्या विश्वचषकात तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून संघासोबत होता. आता रिंकू २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. सलग दोनदा (२०२४ आणि २०२६) विश्वविजेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. तसेच २००७, २०२४ आणि २०२६ असे एकूण तीनवेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव देश बनला आहे.