
बांग्लादेशच्या धर्तीवर सध्या महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेतील तेरावा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानकडून भारतीय संघाचा १३ धावांनी पराभव झाला. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघानं आशिया चषकात प्रथमच भारताविरुद्ध सामना जिंकला आहे.
सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं २० षटकात ६ विकेट्स गमावून भारतासमोर १३८ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक तीन विकेट्स तर, पूजा वस्त्राकरनं दोन विकेट्स घेतल्या.
पाकिस्ताननं (Paksitan) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची तारांबळ उडाली. भारताकडून ऋषा घोषनं सर्वाधिक 26 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त भारताच्या एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी, भारताचा संघ १९. ४ षटकांत १२४ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून नसरा संधूनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर,सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स पडली. अखेर हा सामना पाकिस्तानने १३ धावांनी जिंकला.
आशिया चषक २०२२ मधील भारताचा हा पहिला पराभव आहे. यापूर्वी भारतानं गट सामन्यात सलग तीन सामने जिंकले होते. विजयरथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्कं करायचं होतं. पण पाकिस्तानच्या संघानं भारताच्या आशेवर पाणी फेरलं.