
Women's Asia Cup 2026
सध्या भारतीय संघासमोर मोठे आव्हान असेल ते म्हणजे संघाचा सध्याचा फॉर्म. भारताने यावर्षी खेळल्या गेलेल्या १६ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी नऊ सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्यांच्या शेवटच्या टी२० विश्वचषक पराभवामुळे भारताचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले. आता, संघ आशिया चषकात चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा लय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
ही स्पर्धा कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी वैयक्तिकरित्याही महत्त्वाची आहे. तिच्या फॉर्मबद्दल आणि टी-२० क्रिकेटमधील भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण विश्वचषक सामन्यात तिने एक निर्णायक खेळी खेळली असली तरी, संपूर्ण स्पर्धेत तिचा फॉर्म हा चर्चेचा विषय होता. आशिया कपनंतर पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई खेळांचे आव्हानही भारतासमोर आहे. त्यामुळे, संघ व्यवस्थापनाला कर्णधारासह प्रमुख खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सर्वोत्तम फॉर्म परत मिळवावा अशी अपेक्षा असेल. आशिया कपमध्ये भारताला स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जची उणीव भासेल. ती या स्पर्धेतून आणि आशियाई खेळांमधून बाहेर आहे. तिच्या जागी प्रतिभावान फलंदाज प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. जेमिमाच्या अनुपस्थितीत, भारत अजूनही जलद धावा करणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाच्या शोधात आहे.
आपल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगला सहा धावांनी पराभूत केल्यानंतर थायलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रथम फलंदाजी करताना संघाने केवळ १२० धावा केल्या असल्या तरी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत हाँगकाँगला ११४/७ धावांवर रोखले. कर्णधार नरुमोल चवाईने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर ओन्निचा कामचोम्फूने तीन आणि फनिता मायाने दोन विकेट्स घेतले. त्यामुळे, भारत थायलंडला कमी लेखण्याची चूक करु शकत नाही.
भारत थायलंडविरुद्ध एक मजबूत संघ मैदानात उतरवू शकतो. संघ व्यवस्थापन टॉप आर्डर मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. परंतु, खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार, राधा यादव किंवा प्रेमा रावत यांनाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळू शकते. भारतासाठी, थायलंडविरुद्धचा सामना केवळ मोहिमेची सुरुवातच नाही, तर आगामी मोठ्या स्पर्धांपूर्वी सुधारणा करण्याची संधी देखील असेल. संघ विजयाने सुरुवात करून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये पुन्हा गती मिळवण्याचा प्रयत्न करेल.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 : स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर आणि श्री चरणी.
बुद्धिबळाच्या पटावर R Praggnanandhaa चा डंका! Grand Chess Tour जिंकणारा पहिला भारतीय