
टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, गोरखपूर लायन्सने यश दयालला कायम ठेवले आहे. या फ्रँचायझीने आर्यन जुयाल आणि सिद्धार्थ यादव यांनाही कायम ठेवले आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिनी लिलाव होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, यूपीटी२० लीग नियामक परिषदेचे अध्यक्ष संजय कपूर यांनी दयाल स्पर्धेसाठी उपलब्ध असेल याची पुष्टी केली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (UPCA) सचिव प्रेम मनोहर गुप्ता यांनी सांगितले की, या वेगवान गोलंदाजाला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले जाईल. गुप्ता म्हणाले, ‘सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे यूपीसीए यश दयालला देशांतर्गत आणि लीग क्रिकेट खेळण्यासाठी एनओसी देईल.’
यश दयाल हा २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग होता. तो २०२६ मध्येही संघाचा भाग होता. त्याच्यावर लग्नाच्या नावाखाली लैंगिक छळाचे आरोप होते. तरही, फ्रँचायझीने त्याला ५ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले. परंतु कायदेशीर कार्यवाहीमुळे फ्रँचायझीने त्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२६ मध्ये दयाल आरसीबीसाठी एकही सामना खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, रसिक सलाम दारने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आरसीबीच्या सलग दुसऱ्या आयपीएल ट्रॉफी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
यश दयालने आपला शेवटचा क्रिकेट सामना ३ जून २०२५ रोजी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात खेळला. यानंतर, दयाल क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने २७ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ८४ विकेट्स, २३ लिस्ट ए सामन्यांमध्ये ३६ विकेट्स, आणि ७१ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६६ विकेट्स, घेतले आहेत.