
Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च या टेलिकॉम आणि इंटरनेट ब्रोकरेज फर्मने शेअर केलेल्या एका अहवालानुसार, भारतीय टेलिकॉम बाजारातील बाजारातील मोठ्या कंपन्यांची संख्या मर्यादित आहे. यामुळे टॅरिफ वाढवले जाणार असल्याची शक्यता अधिक दाट झाली आहे. जर कंपनीने रिचार्जच्या किंमतीत 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला तर याचा परिणाम प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांवर होऊ शकतो. या दोन्ही ग्राहकांना रिचार्ज प्लॅन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)
रिपार्टनुसार, मोबाईल यूजर्स सध्या मोठे संख्येने 5जी नेटवर्ककडे वळत आहेत. याशिवाय देशातील पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे जून तिमाहीत दूरसंचार कंपन्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसुल (ARPU) 1 ते 1.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, उत्तम नेटवर्क सेवा आणि जास्त डेटाचा वापर होत असल्यामुळे कंपन्यांच्या कमाईत सतत वाढ होत आहे. सेंट्रमने म्हटले आहे की, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांचा बाजारहिस्सा (मार्केट शेअर) वाढणे सुरूच राहील आणि तो व्होडाफोन आयडियाच्या हिश्श्यातून मिळवला जाईल.
अशी शक्यता वर्तवली जात आहे की, जून तिमाहीमध्ये भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली रिलायंस जियो सुमारे 70 लाख नवीन ग्राहक जोडू शकते. तर दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एयरटेल सुमारे 50 लाख नवीन ग्राहक जोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर वोडाफोन आइडिया केवळ 2 लाख नवीन ग्राहक जोडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात गेल्या काही वर्षांपासून ब्रॉडबँड सेवांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. रिपार्टमध्ये आता असं सांगितलं जात आहे की, जियो आणि एयरटेलने आतापर्यंत देशातील 90 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. कंपन्या सध्या जास्तीत जास्त 5जी स्मार्टफोन यूजर्सना त्यांच्या नेटवर्कसोबत जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय, 5जी आधारित फिक्स्ड वायरलेस एक्सेस (एफडब्ल्यूए) आणि ब्राडबँड सेवांच्या मागणीत देखील झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वोडाफोन आयडिया त्यांच्या 5जी नेटवर्कचा विस्तार करत असून ते 100 शहरांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, कंपनीची एजीआर थकबाकीही कमी झाली आहे.