(फोटो सौजन्य: X)
भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इथे बंदी घातल्यानंतर नेपाळ Gen Z तरुणांमध्ये असंतोष माजला. संतापलेल्या तरुणांनी देशभर आंदोलने केली, ज्यामुळे याला एक हिंसक वळण मिळाले. बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणांनी निदर्शने जारी केली आणि या निदर्शनात सामील झालेल्या लोकांनी शहरांमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. या सर्वच गोष्टीमुळे देशात अराजकता निर्माण झाली, गोष्ट एवढी वाढली की नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान माहितीनुसार, नेपाळच्या अर्थमंत्र्यांवरही आंदोलकांकडून पाठलाग आणि हल्ला करण्यात आला आणि त्यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. यावरून सध्या नेपाळमधील परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. अर्थमंत्र्यांना भररस्त्यात मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं?
निदर्शनादरम्यान, नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा निदर्शकांनी पाठलाग केला. काठमांडूच्या रस्त्यावर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात विष्णू पौडेल आपला जीव वाचवत पळताना दिसून येतात पण तितक्यात एकजण धावतच येऊन त्यांना लाथेने भिंतीवर आदळतो. यांनतर अर्थमंत्री पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत असतानाच आंदोलक लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारण्यास सुरुवात करतात. यानंतरही आपला जीव वाचवण्यासाठी आणि तिथून सुटका मिळवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसतात पण २५-३० लोकांच्या ताकदीपुढे त्यांचं काहीच चालत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नेपाळच्या जनरल झेड युवकांच्या या निदर्शनाने सरकारला चांगलेच हादरवून सोडले आहे आणि ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड करत आहे. घटनेचा व्हिडिओ @PicturesFoIder नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
अनेक मंत्र्यांनी दिले राजीनामे…
या हिंसक निषेधाच्या दबावाखाली पहिले गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामा दिला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
संसद भवनात तोडफोड
संतप्त निदर्शकांनी संसदेच्या इमारतीत घुसून तोडफोड केली आणि आग लावली. याशिवाय माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि शेर बहादूर देऊबा यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला. गृहमंत्री रमेश लेखक आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांची घरेही जाळण्यात आली. पोलिसांनी कडकपणा दाखवला, पण परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नाहीये. या हिंसाचारात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो जण जखमी झाले आहेत.