
Pakistan Political Crisis Sindh Division News
पाकिस्तान (Sindh Division)पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे विभाजन होणार? लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या योजनेवर भडकले बिलावल भुट्टो-झरदारी सध्या अत्यंत गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संकटाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. देशातील सध्याची प्रशासकीय रचना पूर्णपणे कोलमडल्याचा दावा करत शेहबाज शरीफ सरकार आणि पाकिस्तानी लष्कराने देशाचे पुनर्गठन करण्याचा घाट घातला आहे. या नव्या प्रस्तावानुसार, पाकिस्तानमधील सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या चार प्रमुख प्रांतांचे विघटन करून सुमारे १२ ते १५ नवीन लहान प्रांत तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र, लष्कराच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात, विशेषतः सिंध प्रांतात तीव्र असंतोषाची आणि संतापाची लाट उसळली आहे.
सिंध प्रांतात सत्तास्थानी असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) या प्रस्तावाविरोधात थेट युद्धाचे रान शिंगले आहे. लंडनमध्ये आपले वडील आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्यासोबत असलेल्या बिलावल भुट्टो-झरदारी यांनी या प्रस्तावावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. बिलावल यांनी लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे जवळचे मानले जाणारे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Israel Sanctions: वेस्ट बँक वादात इस्रायल आक्रमक! ब्रिटनविरोधात घेतले 4 मोठे कठोर निर्णय; राजनैतिक वर्तुळात खळबळ
बिलावल भुट्टो यांनी नक्वींना फटकारताना स्पष्ट केले की, प्रांताच्या विभाजनासारखा अत्यंत संवेदनशील आणि घटनात्मक मुद्दा व्यावसायिक मंचांवर किंवा खाजगी बैठकांमध्ये मांडणे बंद करावे. जर लष्कर आणि सरकारला खरोखरच प्रांतांचे विभाजन करायचे असेल, तर त्यांनी पळवाट न शोधता थेट देशाच्या संसदेत आणि संबंधित प्रांतिक विधानसभांमध्ये येऊन हा प्रस्ताव मांडावा. संसदेत लोकप्रतिनिधींसमोर यावर खुली चर्चा झाली पाहिजे, असा थेट इशाराच बिलावल यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या सिंध विधानसभेने आधीच या प्रस्तावाला एकमुखाने फेटाळून लावले आहे. सिंधच्या प्रादेशिक अखंडतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांनी तर असे स्पष्ट केले आहे की, सिंधची भूमी आमची आई आहे आणि तिच्या तुकड्यांसाठी कोणताही सिंधी नागरिक तयार होणार नाही. जर लष्कराने जबरदस्तीने सिंध प्रांताचे विभाजन करण्याचा किंवा कराचीला वेगळे करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानात बलुचिस्तानसारखी गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही प्रांतिक नेत्यांनी दिला आहे.
वास्तविक पाहता, लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि गृहमंत्री मोहसिन नक्वी यांचा असा युक्तिवाद आहे की, सध्याचे प्रांत भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठे आणि मध्यवर्ती सत्ताकेंद्राने व्यापलेले आहेत. यामुळे आरोग्य, शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. लहान प्रशासकीय युनिट्स तयार केल्यास प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, असा दावा लष्कराकडून केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greece : करोडोंचे मालक ब्रिटन सोडून ग्रीसमध्ये का जात आहेत? जाणून घ्या कर सवलत अन् लक्झरी जीवनशैलीचे मुख्य रहस्य
परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रस्तावामागे लष्कराचा एक मोठा राजकीय हेतू दडला आहे. सिंध हा नेहमीच भुट्टो कुटुंब आणि PPP चा मजबूत राजकीय बालेकिल्ला राहिला आहे. जर सिंधचे ३ ते ४ तुकडे केले गेले, तर PPP चा राजकीय प्रभाव आणि जनाधार आपोआपच नष्ट होईल. लष्कराला सर्व प्रांतांवर आपले थेट नियंत्रण प्रस्थापित करायचे आहे, म्हणूनच ते ‘प्रशासकीय सुधारणा’ या नावाखाली प्रांतांचे तुकडे करू इच्छितात.
या संपूर्ण वादा मुळे पाकिस्तानमधील सत्ताधारी आघाडीतही मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. एकीकडे शाहबाज शरीफ सरकारमधील काही मंत्री या प्रस्तावाच्या समर्थनार्थ देशात वातावरणनिर्मिती करत आहेत, तर दुसरीकडे PPP सारखा मोठा मित्रपक्ष थेट लष्कराशी दोन हात करायला तयार झाला आहे. जर सिंधच्या विभाजनाचा प्रस्ताव मागे घेतला गेला नाही, तर पाकिस्तानमधील सध्याचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.