
Thalapathy Vijay
थलपती विजय(Thalapathy Vijay) च्या विजयाकडे दक्षिण भारताच्या राजकारणातील एक नवा अध्याय म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेतील तामिळ प्रसारमाध्यमांनी याचे वर्णन विशाल विजय म्हणून केले आहेत. श्रीलंकेतील तमिळ नेत्यांनी याचे स्वागत केले आहे. मात्र तेथील सरकारमध्ये थलपतीच्या विजयाने अस्वस्थेतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीलंकेच्या अस्वस्थेचे मुख्य कारण म्हणजे कच्चाथिवू बेट, ज्यावरुन विजय थलपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या वर्षी या बेटावर तमिळ मच्छीमारांवर हल्ला झाला होता. यावर विजय यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हे बेट सध्या श्रीलंकेच्या ताब्यात आहे. या निर्जन बेटाला भारताकडे सोपवण्याची मागणीही विजय थलपती यांनी केली होती.
त्यांनी मच्छिमारांवरील हल्ल्याचा आरोप श्रीलंकेवर केला होता. यामुळे हे बेट परत घेण्याची त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली होती. तर मच्छिमारांची सुरक्षा होईल असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर श्रीलंकेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. आता थलपती विजय सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद पुन्हा एकदा उफाळू शकतो.
१९७४ च्या करारानुसार, भारत सरकारने कच्चाथिवू बेट श्रीलंकेला सोपवले होते. परंतु तामिळनाडूत कच्चाथिवू बेट नेहमीच भावनिक आणि राजनैतिक मुद्दा राहिला आहे. १९९१ पासून हे बेट परत मिळवण्याचा तामिळनाडू सरकारने प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी संसदेत अनेकदा ठराव संमत करण्यात आले आहे.
सध्या थलपती विजय सत्तेत आल्याने पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे या बेटासाठी दबाव वाढू शकतो. यामुळे भारत आणि श्रीलंका (Sri Lanka) संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. थलपतीच्या विजयाने कच्चाथिवू बेट आशियाई राजकारणात पुन्हा एकदा वादाचा मुद्दा ठरु शकते.