
रस्त्यावरून चालताना अचानक पाठीमागून आलेल्या मोठ्या हॉर्नच्या आवाजाने आपण दचकतो, हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला आहे. आज शहरांमधील वाहतुकीच्या गोंगाटात हॉर्नचा आवाज हे मानसिक ताण आणि ध्वनी प्रदूषणाचे मोठे कारण बनले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ऑटोमोबाईल जगतात एका नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत आहे, ते म्हणजे ‘डायरेक्शनल साऊंड हॉर्न’ किंवा ‘सायलेंट हॉर्न’.
काय आहे हे ‘सायलेंट हॉर्न‘ तंत्रज्ञान?
सध्याच्या गाड्यांमधील हॉर्न वाजवल्यावर त्याचा आवाज सर्व दिशांना पसरतो. यामुळे रस्त्यावरील संबंधित व्यक्तीसोबतच आजूबाजूचे रहिवासी, हॉस्पिटल्स आणि इतर वाहनचालकांनाही नाहक त्रास होतो. याउलट, ‘डायरेक्शनल साऊंड’ तंत्रज्ञानामध्ये अल्ट्रासॉनिक वेव्ह्ज चा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आवाजाला विखुरण्याऐवजी एका ‘लेझर बीम’सारखे थेट समोर असलेल्या विशिष्ट पादचाऱ्याच्या दिशेने पाठवते.
भारतात फॅन्सी हॉर्नवर बंदी का आहे? जाणून घ्या RTO चे नियम आणि दंडाची रक्कम
हे कसे काम करते?
गाडीच्या समोरील भागात बसवलेले सेन्सर्स आणि कॅमेरे आधी रस्त्यावरील पादचाऱ्याचा किंवा अडथळ्याचा शोध घेतात. जेव्हा चालक हॉर्न दाबतो, तेव्हा आवाज फक्त त्याच व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या व्यक्तीच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीलाही हा आवाज ऐकू येत नाही. गाडीच्या आत बसलेल्या चालकाला आणि आजूबाजूच्या परिसराला याचा अजिबात त्रास होत नाही, म्हणूनच याला ‘सायलेंट हॉर्न’ म्हटले जाते.
माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या
या तंत्रज्ञानाचे फायदे
१. ध्वनी प्रदूषणातून मुक्ती: शहरांमधील हॉर्नचा गोंगाट ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, ज्यामुळे ‘सायलेंट झोन’ खऱ्या अर्थाने शांत राहतील.
२. अपघातांमध्ये घट: रस्त्यावरून चालणारी व्यक्ती दचकून पळण्याऐवजी सतर्क होईल, ज्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात टळतील.
३. मानसिक शांतता: ट्रॅफिक जॅममध्ये विनाकारण वाजणाऱ्या हॉर्नमुळे वाहनचालकांमध्ये होणारी चिडचिड आणि ‘रोड रेज’ च्या घटना कमी होतील.
भविष्याचा वेध– जागतिक स्तरावर अनेक मोठ्या कार कंपन्या आणि स्टार्टअप्स या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. वाढत्या इलेक्ट्रीक वाहनांच्या युगात, जिथे गाड्या स्वतःच खूप शांत आहेत, तिथे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे डायरेक्शनल हॉर्न तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान भारतीय रस्त्यांवरही पाहायला मिळेल, अशी आशा आहे.