महाराष्ट्र पुन्हा दाखवणार देशाला हरित वाहतुकीची दिशा; टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण
टाटा मोटर्सने ७ ते ५५ टन क्षमतेच्या भारतातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण केले. या ऐतिहासिक प्रसंगी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याच्या EV धोरणामुळे वाहन उत्पादक, उद्योग आणि वाहतूक क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
भारतातील टॉप 10 ऑटोमोबाईल फेस्टिव्हल्स! गाड्या आणि बाईकप्रेमींसाठी असते ही खास पर्वणी! जाणून घ्या
“पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केलेले हे इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय कौशल्य, तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता यांची ताकद या वाहनांमधून दिसून येते,” असे सरनाईक यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक ट्रकच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्याबरोबरच वाहतूकदारांचा इंधनावरील खर्च आणि एकूण ऑपरेटिंग खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसाय अधिक किफायतशीर, स्पर्धात्मक आणि शाश्वत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“माननीय पंतप्रधानांनी २०७० पर्यंत ‘नेट-झिरो’चे लक्ष्य निश्चित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वाहतूक क्षेत्राचे विद्युतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लेक्ट्रिक ट्रक ही त्या दिशेने टाकलेली निर्णायक पावले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
या इलेक्ट्रिक ट्रकची एका चार्जमध्ये सुमारे ३५० किलोमीटरपर्यंतची रेंज, फास्ट चार्जिंगची सुविधा आणि कमी ऑपरेटिंग खर्च ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळेत चार्जिंग पूर्ण झाल्याने ट्रक अधिक वेळ रस्त्यावर धावू शकतो आणि वाहतूकदारांची उत्पादकता वाढू शकते.
“हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नाही, तर वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. भविष्यातील व्यावसायिक वाहतुकीची दिशा आता स्पष्ट झाली आहे,” असे सरनाईक म्हणाले.
महाराष्ट्राच्या EV धोरणासोबतच केंद्र सरकारच्या PM E-DRIVE योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार, वाहन उत्पादक आणि वाहतूकदार यांच्यातील प्रभावी भागीदारीमुळे देशात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचा वापर वेगाने वाढेल, असे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक मोबिलिटीमुळे केवळ वाहन उद्योगातच नव्हे, तर बॅटरी तंत्रज्ञान, संशोधन-विकास, उत्पादन, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि वाहन सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण होतील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“आज आपण केवळ इलेक्ट्रिक ट्रकचे लॉन्चिंग करत नाही, तर स्वच्छ, आत्मनिर्भर आणि शाश्वत भारताच्या भविष्याचा मार्ग खुला करत आहोत. महाराष्ट्र या परिवर्तनात केवळ सहभागी राहणार नाही, तर त्याचे नेतृत्व करेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.






